सोमवार, २८ ऑक्टोबर, २०१३

जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग २ : आलवक नामक यक्षाची गोष्ट)

मागील भागात आपण माराची कथा बघितली,, जर तुमच्यापैकी कोणी वाचली नसेल तर इथे क्लिक करा.....


या भागात आपण बुद्ध भगवंतांनी आलवक नावाच्या निष्ठुर ह्रदयी यक्षावर कशाप्रकारे विजय मिळविला ते पाहणार आहोत, तरी त्यातुन आपण योग्य तो बोध घ्यावा....




मारातिरेक-मभियुज्झित-सब्बरंत्ती, घोरम्पनाल वक मक्ख मथद्ध यक्ख । खान्ति सुदन्तविधिना जितवा मुनिन्दो, तं तेजसा भवतु ते जयमंगलानि


ज्या मुनींद्राने, माराशिवाय समस्त रात्र संग्राम करणाऱ्या घोर, दुर्धर आणि निष्ठुर ह्रदयाच्या आलवक नावाच्या यक्षाला क्षांती आणि संयमाच्या बळाने जिंकले त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो.



एकदा भगवान बुद्ध आळवी मध्ये आरामांत थांबले होते. तेव्हा आलवक नावाचा निष्ठुर यक्ष त्यांच्या जवळ येऊन म्हणाला,

इथुन चालता हो,,

त्यावर तथागत उत्तरले, मित्रा, मी इथुन जाणार नाही, तुला जे करायचे आहे ते कर.

मी तुला प्रश्न विचारतो, जर तु त्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकला नाहीस तर तुझे पाय पकडुन गंगेच्या पलीकडे फेकीन.


भगवान म्हणाले, माझ्या मित्रा सर्व देवांगणांत, मारांमध्ये, ब्रह्मांमध्ये नाही श्रमण आणि ब्राह्मणांमध्ये असा कोणी जो माझ्या मनापर्यंत पोहोचु शकेल. आणि माझे पाय धरुन मला गंगेच्या पलीकडे फेकु शकेल. पण जाऊदे,, तुला जे काही विचारायचे आहे ते विचार.

आलवक म्हणाला,

•मनुष्याचे श्रेष्ठ धन कोणते?

•कोणते सत्कृत्य त्याच्यासाठी सुखकारक आहे?

•कोणत्या प्रकारच्या आचरणाने त्याचे जीवन श्रेष्ठ होते?



भगवान म्हणाले -

••► श्रद्धा हे मनुष्याचे श्रेष्ठ धन होय.

••►सद्धम्माचे संपादन केल्यास जीवन सुखकारक होते. सत्य हा सर्वोच्च उद्धारक आहे.

••►सन्मार्गाने प्रज्ञापुर्वक वागणाऱ्यांचे जीवन श्रेष्ठ आहे.



आलवक म्हणाला,

• मनुष्य पुरातुन बाहेर कसा निघतो?

• तो अर्णव (समुद्र) कसा पार करतो?

•मनुष्य दुःखाच्या पार कसा जातो?
तो परिशुद्ध कसा होतो.?



भगवान म्हणाले,

••► मनुष्य श्रद्धेने पुरातुन पोहुन बाहेर येतो.

••► सावधानपणाने अर्णव तरतो.

••► उत्साहाने दुःखाच्या पार जातो.

••► प्रज्ञेने परिशुद्ध होतो.



आलवक म्हणाला,

• मनुष्य कशाने प्रज्ञा मिळवतो?

• धन कसे मिळवतो?

• किर्ती कशी प्राप्त करतो?

• मित्र कसे मिळवितो?

• कोणता मनुष्य परलोकात गेल्यावर शोक करत नाही?




भगवान म्हणाले,

••►अरहंताच्या निर्वाणप्राप्तीच्या धम्मावर श्रद्धा ठेवुन श्रद्धावान व प्रज्ञावंत मनुष्य शुश्रुषेने प्रज्ञा मिळवितो.

••► योग्य मेहनत करणारा, धुरा वाहणारा, सत्याने किर्ती प्राप्त करणारा, दानाने मित्र जोडतो.

••► ज्या गृहस्थाकडे सत्य, संयम, अहिंसा व दमन हे गुण आहेत. तो परलोकात गेल्यावर शोक करत नाही. हवे असल्यास निरनिराळ्या श्रमण ब्राह्मणांकडे जाऊन विचार श्रेष्ठ, दम, त्याग आणि क्षांति यांच्यापेक्षा श्रेष्ठ या लोकात काय आहे?


यावर आलवक नामक यक्ष म्हणाला, मी निरनिराळ्या श्रमण आणि ब्राह्मणांना कशाला विचारु? जेव्हा तथागतांनी येथेच मला सत्याचे दर्शन घडवुन दिले. मला माझ्या जीवनाचा लाभ समजला आहे.


खरोखरच माझ्या लाभासाठी तथागत आळवीला रहावयास आले, त्यामुळे कोणाला दान दिले असता ते लाभदायक होते हे मला समजले. मी सम्यक संबुद्धाला आणि त्याच्या धम्माच्या सुधर्मतेला नमस्कार करीत गावो गावी आणि शहरो शहरी फिरत राहीन.


धन्य धन्य गौतमा,, आजपासुन मी तुला शरण जातो.
असे म्हणत आलवक भगवान बुद्धांना शरण गेला तेथेच त्याची उपसंपदा झाली.




मारातिरेक-मभियुज्झित-सब्बरंत्ती, घोरम्पनालवक मक्ख मथद्ध यक्ख । खान्ति सुदन्तविधिना जितवा मुनिन्दो, 
तं तेजसा भवतु ते जयमंगलानि



ज्या मुनींद्राने, माराशिवाय समस्त रात्र संग्राम करणाऱ्या घोर, दुर्धर आणि निष्ठुर ह्रदयाच्या आलवक नावाच्या यक्षाला क्षांती आणि संयमाच्या बळाने जिंकले त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो.

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...



Read Also :

१. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग १ : मारकथा)


शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१३

जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग १ : मारकथा)




जयमंगल अष्टगाथा अर्थात भगवान बुद्धांचे आठ मोठे विजय ज्यांना Stanzas of Victory असेही म्हणतात. या जयमंगल अष्टगाथांचे बौद्ध तत्वज्ञानात खुप महत्व आहे. जयमंगल अष्टगाथा व त्यांच्या कथा या लेखमालिकेत आपण त्या आठ विजयांबद्दल सविस्तर माहीती, त्यांच्या गाथांमागे असलेल्या कथा काय आहेत ते पाहुया... त्या कथांमधुन तुम्ही योग्य तो बोध घ्यावा..... 


जयमंगल अष्टगाथा मधल्या पहिल्या गाथेमध्ये माराची गोष्ट सांगीतली आहे ती याप्रमाणे,,,





बाहुं सहस्समभिनिम्मित सायुधंतं
गिरिमेखलं उदित-घोर-सरेन मारं
दानादि धम्म विदिना, जितवा मुनिंदो,
तं ते जसा भवतु ते जयमङ्गलानि



ज्या मुनींद्राने अत्यंत तीक्ष्ण हत्यार घेऊन सहस्रबाहु, गिरिमेखलं नावाच्या हत्तीवर आरुढ झालेल्या व अत्यंत भयानक व अफाट सेनेसह आलेल्या माराला आपल्या दान आदि धर्मबळाने जिंकले,, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो...



मारावर विजय



परिव्राजक सिद्धार्थ बुद्ध होण्याच्या तयारीत आहेत, हे पाहून माराला अतिशय वाईट वाटले. तेव्हा तो स्वतःशीच म्हणाला आजपर्यंत कोणत्याही श्रमणाने किंवा ब्राह्मणाने माझा पराजय केला नाही. परंतु हा श्रमण गौतम खुप दृढनिश्चयी दिसतो, हा माझा अपमान करुन माझ्यापासुन स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करत आहे, मला याचे वेळीच दमन करायला हवे, नाहीतर तो माझ्या हातुन कायमचा सुटेल व माझ्यविरुद्ध बंड करुन उठेल. असा विचार करुन माराने त्याच क्षणी आपली सेना तयार केली.


अशा प्रकारे आपल्या अफाट सेनेला पुढे पाठवुन मार गिरीमेखल नावाच्या हत्तीवर आरुढ होऊन त्यांच्या मागोमाग आला. इकडे माराच्या अफाट सेनेने बोधीसत्त्वाचा पराभव करण्यासाठी प्रयत्नांची पाराकाष्टा केली होती. आपल्या शस्त्रांचा वर्षाव त्यांनी बोधीसत्वावर चालवला होता. परंतु त्या शस्त्रास्त्रांची फुले बनुन बोधीसत्त्वाच्या अंगावर येऊन पडत होती. कोणतीच शस्त्रास्त्रे बोधीसत्वाच्या अंगावर काहीच परिणाम करु शकत नव्हती. मारालाही कळुन चुकले होते कि आपल्या अफाट सेनेचा पराभव निश्चित आहे, त्याला त्याच्या सेनेचा पराभव दिसत होता, तेव्हा त्याने आपल्या पराभवाने वादळ उत्पन्न केले. आसपासचे वृक्ष कोसळु लागले, पशूपक्ष्यांचा एकच आक्रोश सुरु झाला. परंतु बोधीसत्व आपल्या समाधीपासुन तीळमात्रही ढळला नाही.


तेव्हा बोधीसत्वाला पाण्याने बुडवुन मारीन म्हणुन त्यान पाऊस पाडला, जिकडे तिकडे महापुर आणला परंतु पाण्याचा एकही थेंब बोधीसत्वाला स्पर्श केला नाही.


त्यामुळे व्यथीत झालेल्या माराने सहा प्रकारच्या वृष्टी उत्पन्न केल्या परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही. हे पाहुन मार अतिशय खिन्न झाला. तरीसुद्धा त्याने प्रयत्न करणे सोडले नाही. त्याने भयानक काळोख उत्पन्न केला, ती वैशाख शुद्ध पोर्णीमेची रात्र होती. पोर्णीमेच्या चंद्राने आणि चांदण्याने रात्र खुप प्रकाशलेली होती. परंतु माराने बोधीवृक्षाजवळ भयानक अंधकार पसरविल्या कारणाने, माराचा गिरीमेखल हत्ती व जवळपासची पर्वतशिखरे घुबडांना दिसेनाशी झाली. परंतु बोधीसत्वाच्या प्रज्ञारुपी प्रदीपापुढे माराचा अज्ञान रुपी अंधकारचा नायनाट केला.


आजपर्यंत त्या माराला पराभव काय आहे, हे माहीतच नव्हते, आजपर्यंत त्याचा कधीच पराभव झाला नव्हता. जरी एखाद्या श्रमणाने किंवा ब्राह्मणाने माराविरुद्ध युद्ध पुकारले तरी मार आपल्या एखाद्या तुकडीला पाठवुन त्याचा तेव्हाच पराभव करायचा.


श्रमण गौतम साधारण तपस्वी नव्हता हे जाणुनच माराने आपल्या सैन्याला त्याच्यावर तुटुन पडायच्या आज्ञा केल्या होत्या, परंतु आपल्या अफाट सेनेला बोधीसत्व चारी मुंड्या चित करल हे त्या जाणले नव्हते. आपली सर्व शक्ती पणाला लावुन देखील तो बोधीसत्वाला आपल्य मार्गापासुन क्षणभरही विचलीत करु शकला नव्हता, आता परभवाची वार्ता घेऊन माघारी जाण्यापेक्षा बोधीसत्वावर हल्ला करणे माराला योग्य वाटले. तेव्हा मार आपल्या गिरीमेखल हत्तीवरुन खाली उतरला आणि बोधीसत्वाला म्हणाला सिद्धार्था इथुन मुकाट्याने चालता हो, नाहीतर एका क्षणात तुझा नाश करेन.

तेव्हा बोधीसत्व म्हणतो, हे पापी मारा, तुझ्या सैन्यांना मी चांगल्या प्रकारे ओळखतो, वेगवेगळ्या प्रकारच्या चैनीच्या वस्तु हि तुझी सर्वात पुढे जाणारी तुकडी आहे. तहान, भुक, तृष्णा, आळस, गर्व, किर्तीची आशा, आत्मस्तुती आदी, ह्या तुकड्या त्यामागोमाग येत असतात. कच्च्या मातीचे भांडे जसे फोडतात त्याप्रमाणे मी तुझ्या सैन्याचा पराभव करेन.


हे ऐकुन मार म्हणाला, त्या सर्व गोष्टींना जाऊदे,, आधी तु ज्या आसनावर बसला आहेस, तिथुन उठ ते माझे आसन आहे. चल ताबडतोब चालता हो इथुन. त्यावर बोधीसत्व म्हणाला, कशावरुन तु म्हणत आहेस कि हे तुझे आसन आहे, याचा तुझ्याकडे काही पुरावा आहे काय? हा प्रश्न ऐकुन माराच्या सेनेतील अनेक लोक योध्ये म्हणायला आहोत कि आम्ही साक्षी आहोत. तेव्हा पापी मार बोधीसत्वाला म्हणाला कि, सिद्धार्था हा माझा पुरावा आहे, चल आता इथुन मुकाट्याने चालता हो. त्यावर बोधीसत्व म्हणाला कि मी अनेक जन्मी दानपारमिता पुर्ण करुन या आसनावर बसण्याचा अधिकारी बनलो आहे, यावर मार म्हणाला याचा तुझ्याकडे काय पुरावा आहे.


तेव्हा बोधीसत्व म्हणाला हि पृथ्वी साक्षी आहे, हि वसुंधरा साक्षी आहे. याचबरोबर तिथे एक देवता प्रगट झाली आणि तिने साक्ष दिली कि, श्रमण गौतमाने अनेक जन्म घेऊन दानपारमिता पुर्ण केली याबाबत साक्ष दिली. येवढे बोलुन त्या देवतेने आपले ओले केस पिळले आणि त्या प्रवाहाबरोबरच आपल्य अफाट सेनेसह व गिरिमेखल हत्तीसोबत मार वाहुन गेला. माराची झालेली दुर्दशा पाहुन देवांगण बोधीवृक्षाजवळ जमले आणि त्यांनी सिद्धार्थावर पुष्पवृष्टी केली. तेव्हा बोधीसत्वाने पुढील गाथा म्हटली,,



अनेकजातिसंसारं संधाविस्सं अनब्बिसं गहकारकं गवेसन्तो दुक्खा जाति पुनप्पुनं।गहकारकं दिट्टो ऽसि पुन गेहं न काहसि सब्बा ते फासुका भग्गा गहकूटं विसंखितं
विसंखारगतं चितं तव्हानं स्वयमज्झगा।




धम्मपदाच्या १०३ ऱ्या गाथेद्वारे भगवान बुद्ध आपल्याला सांगतात,,


यो सहस्सं सहस्सेन, सङ्गामे मानुसे जिने। एकञ्च जेय्यमत्तानं स वे सङ्गामजुत्तमो॥

जो युद्धात लाखो जेत्यांना जिंकतो (त्या जेत्याहुन), जो एक स्वतःला जिंकतो, तो उत्तम युद्धजेता होय.


खरच तो सर्वश्रेष्ठ विजेता होता.. ज्याने स्वतःलाच जिंकले...



बाहुं सहस्समभिनिम्मित सावुधंतं,
गिरिमेक्खलं उदित-घोर-ससेन मार
दानादि धम्मविधिना जितवा मुनिंदो
तं ते जसा भवतु ते जयमङलानि




ज्या मुनिंद्राने तीक्ष्ण व बळकट हत्यारे धारण केलेल्या सहस्र बाहुबळ निर्माण करुन गिरीमेखल नावाच्या मस्त हत्तीवर बसुन अनंत, भयानक व अफाट सेनेसह माराला क्षणातच आपल्या दानादी धर्मबळाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.


सुचना : हे युद्ध बोधीसत्वाच्या मनातील चांगले विचार विरुद्ध वाईट विचार असे होते, त्याला अलंकारीक रीत्या सजवले आहे.


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


Read Also :

१. बुद्ध पुजा : पाली (Buddha Vandana in Pali)


२. भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे.. (धम्मगुण - नक्की वाचा)


३. मराठी धम्मपद


४. बौद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज

५. बुद्ध वंदना : मराठी

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१३

भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण - नक्की वाचा)

स्वाखातो भगवता धम्मो संदिट्टिको अकालिको एहिपस्सिको ओपनाय्यिको पच्चतं वेदितब्बो विञ्ञुही ति



भगवंताने ज्या श्रेष्ठ धम्माचा उपदेश केला आहे, त्याचे सत्यत्व येथेच डोळ्यासमोर पाहता येते. कालांतराने नाही, तर जो धम्म आपले फळ ताबडतोब देतो, कोणीही ज्याचा अनुभव घ्यावा, जो निर्वाणाकडे घेऊन जातो हा सिद्धांत विज्ञानाद्वारे कोणत्याही शीलवंताला आणि प्रज्ञावंताला अनुभवुन पाहता येते.



आपण धम्म वंदनेची सुरुवात करताना म्हणतो,, स्वाखातो भगवता धम्मो.... यातील भगवता शब्दाचा अर्थ होतो भगवान गौतम बुद्ध, आणि बुद्ध भगवंताद्वारा उपदेशिलेला धम्म. परंतु बुद्ध या शब्दाचा अर्थ काय होतो हा प्रश्न पडने स्वाभावीक आहे. बुद्ध म्हणजे ज्याने बुद्धत्वाची प्राप्ती केली आहे, असा असामान्य मानव, एक प्रबुद्ध मानव तो कोणी ईश्वर नव्हे, त्याचा पुत्र अवतार किंवा प्रेषितही नव्हे.


बुद्धत्वामध्ये अनंत गुण समाविष्ट आहेत, त्याच्यात सर्वोच्च शुद्धता आहे, त्याच्या ह्रदयात सर्व प्राणिमात्रांच्या प्रती असीम करुणा आहे, आणि या करुणेनेच तो प्रबुद्ध मानव जे काही बोलतो त्याला धम्म असे म्हणतात, लोकांच्या विकासात मदत करणे हे धम्माचे कार्य आहे. धम्म म्हणजे दोन मनुष्यांतील संवाद आहेत, जो एक मनुष्य दुसऱ्याला जीवनात प्रोत्साहीत करतो, त्याला धम्म शिकवतो. असा कोणी ईश्वर अस्तित्वात नाही जो मनुष्याला मदत करण्यासाठी स्वर्गातुन पृथ्वीवर येतो.


भगवान बुद्धांनी आपल्या धम्माचा उपदेश श्रेष्ठ पद्धतीने केला आहे. याचा अर्थ बुद्ध मनुष्य प्राण्यांच्या संपर्कात आहेत, त्यांच्या गरजा, त्यांच्या मनाच्या अवस्था बुद्धाला माहीत आहेत, त्यांना कशा प्रकारे मदत करायची हे देखील बुद्धाला माहीत आहे. आपल्या धम्माचा उपदेश करताना कधी कधी ते सुर्य, चंद्र, पशू, पक्षी, फुलांचे सुंदर उदाहरण देतात, तर कधी गोष्टी सांगतात. कारण काही लोकांना गोष्टी द्वारे केलेला उपदेश लवकर समजतो. जेव्हाआपण बुद्धाच्या धम्माचा प्रचार करण्यासाठी वेगवेगळ्या देशात जातो. तेव्हा आपल्याला समजते कि, वेगवेगळ्या देशांतील संस्कृती वेगवेगळ्या आहेत तरी प्रत्येक प्रदेशांतील लोकांना गोष्टी ऐकायला आवडतात, तर काहींना व्याख्यान आवडते. भगवान बुद्ध प्रत्येक प्रकारच्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारे उपदेश करत होते. कारण त्यातील संदेश प्रत्येकाला कळुन यावा. त्यामुळे आम्ही म्हणतो कि, भगवान बुद्धांचा धम्म स्वाखातो आहे.




एकदा भगवान बुद्धांचे दोन शिष्य (ज्यांचा जन्म वैदिक कुळात झाला होता) ते भगवान बुद्धांजवळ आले आणि त्यांना म्हणाले कि 'कृपा करुन आम्हाला तथागतांचा उपदेश सुंदर, सुसंस्कृत आणि सभ्य संस्कृत भाषेमध्ये लोकांपर्यंत पोहोचविण्याची परवानगी द्या'. तेव्हा भगवान म्हणाले, 'नाही माझा धम्म प्रत्येकाला त्याच्या मातृभाषेत शिकु द्या. यामुळे तुम्ही संस्कृत बोलता तर तुम्ही संस्कृत भाषेत धम्म शिका, जर तुमची भाषा पाली (मागधी) असेल तर तुम्ही पाली मध्ये धम्म शिका, हे धम्माचे तत्वज्ञान आहे, त्याला भाषेमध्ये बांधुन ठेवु नका, धम्माची कोणती एक भाषा नाही. याप्रकारे बुद्धाचा धम्म ज्या ज्या प्रदेशात गेला त्या त्या प्रदेशात त्याच्या धम्माचे अनुवाद स्थानिक भाषेत झाले. काही धर्मांमध्ये त्यांचा स्वतःचा एक पुरोहीत असतो, ज्यांची स्वतःची एक पवित्र भाषा असते. आणि त्यामुळे त्यांचा धर्म ग्रंथ काहीच व्यक्तींसाठी सीमित असतो, पण बुद्धांच्या उपदेशांबाबत असे नाही आहे. त्यांच्या उपदेशांचा ज्याप्रमाणे जमेल तितका प्रचार करायला हवा. यामुळेच बुद्धाचा धम्म स्वाखातो आहे, योग्य प्रकारे शिकवला आहे. त्यामुळे आपण जेव्हा केव्हा स्वाखातो भगवता धम्मो असे म्हणतो तेव्हा ह्या सर्व गोष्टी मनात आणायला हव्यात.



बुद्ध भगवंतांनी ज्या सर्वश्रेष्ठ धम्माचा उपदेश केला आहे तो संदिट्ठिको आहे. याचा अर्थ असा होतो कि जर तुम्ही बुद्धाच्या धम्मानुसार आचरण कराल त्याचे फळ तुम्हाला ताबडतोब मिळेल. काही धर्म असे सांगतात कि जर तुम्ही आमचा धर्म स्वीकाराल आणि त्याच्यानुसार पुण्यकर्म कराल तर मृत्युनंतर स्वर्गात जागा मिळेल. किंवा काही सांगतात कि दुसऱ्या जन्मात श्रेष्ठत्व प्राप्त होईल. म्हणजे त्याचे फळ मेल्यानंतर मिळते. परंतु धम्मानुसार तुम्ही आपल्या जीवनात धम्माचरण कराल तर त्याचे फळ ताबडतोब मिळेल. त्यासाठी दुसऱ्या जन्माची वाट बघत राहण्याची आवश्यकता नाही. जर तुम्हाल धम्माचे फळ मिळत नसेल तर याचा अर्थ असा कि तुम्ही धम्माचरण करत नाही. बुद्धाच्या धम्माचे फळ ताबडतोब मिळते म्हणजे दररोज केवळ 'बुद्धं सरणं गच्छामि' म्हटल्यावर तुम्हाला धम्माचे फळ मिळेल असा अर्थ कोणी काढु नये. त्यासाठी तुम्हाला आर्य शीलाचरण, आर्य धम्माचरण करावे लागेल. बुद्धाच्या धम्माचे आपल्या जीवनात श्रेष्ठ आचरण करावे लागेल, योग्य धम्मचर्या करावी लागेल तेव्हाच त्याचे परिणाम आपल्या जीवनात लगेच दिसु लागेल. यामुळे बुद्धाचा धम्म संदिट्ठिको आहे.



भगवान बुद्धांनी ज्या श्रेष्ठ सद्धम्माचा उपदेश तो धम्म अकालिको आहे, म्हणजे त्याचा काळाशी काहीही संबंध नाही आहे, भगवान बुद्धांची शिकवण आणि सिद्धांत आधुनिक, बुद्धीसुसंगत आणि सदासमकालीन आहेत. त्याचा काळाशी काहीही संबंध नाही. सुमारे अडीच हजार वर्षांपुर्वी ज्या धम्माची शिकवण दिली होती, त्या काळात त्याचे आचरण करत होते त्याचा परिणाम अगदी तोच आजही मिळतो,, लक्ष, दशलक्ष वर्षांनंतरही तोच मिळणार. ज्या धम्मालाकाळाची मर्यादा नाही तो अकालिको आहे, तो विश्वव्यापी आहे, त्याला विशिष्ट प्रदेशाचीही मर्यादा नाही. कोणत्या विशिष्ट देशात जाऊन रहाण्याचीही आवश्यकता नाही. तुम्ही जिथे कुठेही जाणार इंग्लंड किंवा भारत, फिनलॅंड किंवा न्युजीलॅंड, जर्मनी किंवा अमेरिका तिथे तिथे तुम्ही बघाल कि, तेथील संस्कृती भिन्न असेल, परंपरा भिन्न असतील परंतु धम्म हा एकाच प्रकारचा असेल. कारण प्रत्येक प्रदेशातील मानवाचा ह्रदय एकसारखेच असते, मग तो मनुष्य पुर्वेकडील राहणारा असो कि पश्चीमेकडील, उत्तरेकडील अथवा दक्षीणेकडील त्याने काहीही फरक पडत नाही. त्यामुळे एकाच प्रकारच्या धम्माचे आचरण कोणत्याही प्रदेशाची मर्यादा नाही. परंतु जगात असे काही धर्म आहेत कि त्यांना विशिष्ट प्रदेशाची मर्यादा आहे, ज्या धर्मांचे पालन आपण केवळ विशिष्ट राष्ट्रांत करु शकतो.... समजा आपल्याल्या एखाद्या विशिष्ट कार्यासाठी गंगेचे पाणी हवे असेल तर ते आपल्याला गंगेतुनच मिळणार. जर तुम्ही इंग्लंड मध्ये राहत असाल तर एखाद्या बॉटलमध्ये गंगेचे पाणी भरुन इंग्लंडला न्यावे लागेल. त्यामुळे विदेशातील लोकांचे जीवन खुप कष्टमय होते. त्यामुळे काही धर्मांना विशिष्ट प्रदेशांची मर्यादा आहे, ते विश्वव्यापी नाहीत. परंतु बुद्धाचा धम्म विश्वव्यापी आहे. त्याचे आचरण आपण कुठेही करु शकतो. अगदी धृवपदांवर कोणी व्यक्ती राहत असेल तर तो धृवावर सुद्धा बौद्ध धम्माचे आचरण करु शकेल. तिबेटमध्ये प्रत्येक वस्तु बर्फाच्छादित आहे, परंतु तिथेही धम्माचरण केले जाते. इंग्लंडमध्येही हजारो लोक धम्माचरण करतात, ते कुठले लोक आहेत, कोणत्या प्रदेशातील आहेत याने काहीच फरक पडत नाही. कारण बुद्धाचा धम्म अकालिको आणि विश्वव्यापी आहे.




भगवान बुद्धांचा धम्म एहिपस्सीको आहे, एहि म्हणजे या आणि पस्सिको म्हणजे पहा. याप्रकारे एहिपस्सीको चा अर्थ होतो या आणि पहा.. बुद्धांचा धम्म हा असा धम्म आहे जो म्हणतो या स्वतः पहा, स्वतः जाणा त्याचे अंधानुकरण करु नका, केवळ पवित्र धम्मग्रंथांत लिहिली आहे म्हणुन ते सत्य मानु नका, कोणत्या धर्मगुरूने म्हटले म्हणुन त्यावर विश्वास ठेवु नका. ह्या विश्वात आजकाल अनेक धर्मगुरू निर्माण झाले आहेत, केवळ भारतातच नव्हे तर इंग्लॅंड, अमेरिका, आदी राष्ट्रांत त्यापैकी अनेक आपल्या जेट विमानातुन विश्वाचे भ्रमण करत असतात. ते जगाचे इतके चक्कर मारतात कि, त्यांना चक्कर का येत नाही याचे आश्चर्य होते. त्यांच्यापैकी अनेक लोक सांगतात कि आम्ही ईश्वराचे दुत आहोत, आम्ही प्रत्येक गोष्ट जाणतो, आमच्याकडे प्रत्येक प्रश्नाची उत्तरे आहेत कारण आम्ही ईश्वराचे अवतार, त्याचे दुत, त्याचे पुत्र ,आदी आहोत. तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठेवा, आमचे भक्त बना, आम्ही जे काही सांगतो त्याप्रमाणे वागा त्यानंतर तुमचे कल्याण होईल. माझी पुजा करा, माझी प्रार्थना करा, मी तुम्हाला सुरक्षीत ठेवीन. जगातील अनेक धर्मसंस्थापक सुद्धा हेच सांगतात. त्यांच्यातील अनेकांना शिष्य मिळतात, परंतु ते संभ्रमीत असतात, घाबरलेले असतात, दुर्बल असतात. त्यांना वाटते कि ईश्वर येईल आणि आमचे रक्षण करील. परंतु बुद्धाच्या धम्मात याप्रकारचे काहीच नाही. भगवान बुद्धांनी सांगितले कि मी एक मानव आहे. मी एक विशेष अनुभव केला आहे. त्यामुळे मी जे काही सांगतो ते लक्ष देवुन ऐका, तुमच्या बुद्धीच्या तर्कावर त्याची समीक्षा करा, त्या पारखा,, ज्याप्रमाणे सोनार, सोन्याला अग्नीत टाकुन पारखतो, त्याचप्रमाणे तुम्ही माझे शब्द पारखा.. आजपर्यंत झालेल्या कोणत्याच धर्मसंस्थापकाने हे साहस केले नाही, उलट ते म्हणतात कि माझ्यावर विश्वास ठेवा, मीच सत्य आहे, मी तुम्हाला पापमुक्त करेन, मेल्यानंतर स्वर्गात जागा देईन. मी तुमच्यासाठी विचार करेन, तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही. फक्त तुम्ही माझी पुजा करा, माझी प्रार्थना करा, आणि लोकही त्यांचे अंधभक्त बनतात, हे असले अ-धर्म मानवाच्या प्रगतीस हानीकारक आहेत, हे खुप दुर्भाग्यपुर्ण आहे, कारण लोक मोठ्या श्रद्धेने हे करत असतात. परंतु चुकीच्या उपदेशाने लोकं स्वावलंबी बनण्याऐवजी ईश्वरावर परावलंबी बनुन अंधविश्वासाच्या खोल दरीत दिवसेंदिवस जातात. परंतु बुद्धाचा धम्म निराळा आहे, तो एहीपस्सीको आहे, तो म्हणतो या आणि स्वतः पहा, स्वतः जाणा..



भगवान बुद्धांचा धम्म ओपनायिको आहे,,, ओपनायको म्हणजे पुढे जाणारा,, म्हणजे भगवान बुद्धांचा धम्म प्रगतीशील आहे, तो मानवाच्या व्यक्तीत्वाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे, तो मानवाच्या मनुष्यत्वाला उच्च स्तरावर नेतो. भगवान बुद्धांचे उपदेश आम्हाला मनुष्यत्वापासुन,, प्रबुद्धत्वाकडे नेतात, ते आम्हाला सुखी बनवतात, ते आम्हाला प्रज्ञावंत बनवतात, ते आम्हाला करूणा शिकवतात ते आम्हाला सन्मार्गावर नेतात. यामुळे आम्ही म्हणतो कि, भगवान बुद्धांचा धम्म ओपनायिको आहे,,,




शेवटी आम्ही म्हणतो कि बुद्धाचा धम्म पच्चतं वेदितब्बो विञ्ञुहिती आहे. अर्थात बुद्धाचा धम्म कोणत्याही आधुनीक, बुद्धीप्रामाण्यवादी, समजदार व्यक्तीला समजु शकतो. भगवान बुद्धाचा धम्म हा काही कोरा दार्शनिक सिद्धांत नव्हे. तर सम्यक संबुद्धाची ती प्रत्यक्ष अनुभुती आहे. कोणी त्याचा अनुभव घ्यावा. हा धम्म स्वतः अनुभव करण्यासाठी आहे, इकडुन ऐकुन तिकडे सांगण्यासाठी नाही आहे. आपल्याला त्याचा स्वतः अनुभव घ्यावा लागतो. दुसरा कोणीही आपल्यासाठी काहीच करु शकत नाही. आपणच आपल्यासाठी काही करु शकतो. आपण कोणत्या ईश्वराला, त्याच्या अवतारा अथवा त्याच्या दुताला आपली मदत करण्यासाठी बोलवु शकत नाही. अगदी भगवान बुद्धालाही नाही, तुम्हालाच प्रयत्न करायचा आहे, तथागत तर केवळ मार्गदर्शक आहेत. ते आपल्याला केवळ मार्ग दाखवतात. आणि आपल्याला त्या मार्गावर जायचे आहे. तथागत मार्गदाता आहेत, मोक्षदाता नाहीत, ते आमचे अतुलनीय शिक्षक आहेत. यासाठी वास्तवात धम्म काय आहे हे जाणुन घ्यायचे असेल तर त्याचा अनुभव घ्यावा. केवळ हे म्हटल्याने जास्त काही फरक पडणार नाही. जेव्हा आपण ते आचरणात आणु शकलो तेव्हाच आपण खरे बुद्धीस्ट बनु शकतो....


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...




Read Also :

१. बुद्ध पुजा : पाली (Buddha Vandana in Pali)

२. बौद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज

३. Buddha Vandana : English

४. बुद्ध वंदना : मराठी

५. भगवान बुद्धांचा शीलमार्ग......

६. मराठी धम्मपद

७. श्रमणफळ सुत्ताचा मराठी अनुवाद(राजा अजातशत्रुची धम्मदीक्षा)

८. बुद्ध धम्म व काही प्रश्नोत्तरे :
भाग १


९. भगवान बुद्ध : सत्याचा सर्वोत्तम शिक्षक......


मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०१३

आर्य अष्टांगिक मार्ग (मज्झिमा पटिपदा - मध्यम मार्ग)

इतर धर्माप्रमाणे बौद्धधर्माला ईश्वराची कल्पना मान्य नाही. इतर धर्म सृष्टीचा कर्ता करविता परमेश्वर मानतात आणि तोच आपल्या दुःखाचा नाश करतो, अशी त्याची समजुत आहे, परंतु या धर्माला ईश्वराची कल्पनाच मान्य नाही आणि जग हे दुःखमय आहे. असे भगवान म्हणतात, तेव्हा प्रश्न पडतो कि जर ईश्वर अस्तित्वात नाही तर मग मानवाचे दुःख कोण नष्ट करणार? याचे उत्तर बुद्ध भगवंतांनी सांगितले आहे. ज्याचे दुःख त्याने स्वतःनेच दुर करायचे असते. त्यासाठी भगवंतांनी जो मार्ग सांगितला आहे, त्या मार्गाचे पालन केल्यास आपण दुःखाचा नाश करु शकतो असे भगवान बुद्ध म्हणतात. तेव्हा दुःख मुक्तीचा जो मार्ग आहे, तो आठ अंगांनी युक्त असल्यामुळे त्याला 'अष्टांगिक मार्ग' असे म्हणतात. अतिशय चैनीचे जीवन आणि अतिशय कष्टाचे जीवन या दोन्हीच्या मधला मार्ग आहे, यालाच 'मध्यम मार्ग' असे म्हणतात. हाच मार्ग निर्वाणाकडे नेणारा आहे.



सहा वर्षे सतत घोर तपश्चर्येनंतर वयाच्या पस्तीसाव्या वर्षी बोधीसत्व सिद्धार्थाला बुद्धत्व प्राप्त झाले. त्यानंतर भगवान बुद्धांनी आपल्या महापरिनिर्वाणापर्यंत सतत पंचेचाळीस वर्षे धम्माची शिकवण सांगण्यासाठी खर्च केले. त्यांच्या शिकवणुकीस बुद्ध धम्म म्हणतात. आज आशियायी राष्ट्रांमध्ये बुद्ध धम्म हा प्रमुख धम्म म्हणुन बर्याच ठिकाणी आहे. हा धम्ममार्ग सामान्यांच्या विचारांना विशिष्ट धार देणारा धम्म आहे. अयोग्य व हानिकारक विचारांना थांबविणारा मध्यम मार्ग. मध्यम मार्गाचा स्वीकार केल्याने, आचरण केल्याने, आपण दुःखमुक्त होवु शकतो. मध्यम मार्गाचा अवलंब केल्याने आपण आपले निश्चित ध्येय गाठु शकतो, जीवनाचा खरा आनंद प्राप्त करु शकतो.





१.सम्यक दृष्टी :



आर्य अष्टांगिक मार्गात सम्यक दृष्टीचे स्थान सर्वप्रथम आहे. तसे तिचे महत्त्व प्रथम क्रमांकाचे आहे. सम्यक दृष्टीचा लाभ झाल्याशिवाय कोणालाही बुद्धाप्रणित धम्ममार्ग समजायचा नाही. किंबहुना गृहस्थी जीवनातील दुःखाचे अस्तित्व आणि ते निवारण करणारा आर्य अष्टांगिक मार्ग यांना परम सत्य मानुन त्यावर श्रद्धा ठेवणे यालाच सम्यक दृष्टी म्हणतात. सम्यक दृष्टी म्हणजे या विश्वातील अनंत प्रश्नांकडे पाहण्याचा योग्य दृष्टीकोन. वैचारिक अधिष्ठान, अविद्येचा नाश करणे, व्रत वैफल्य यातील फोलपणा समजणे. ईश्वर व आत्मा न मानणे, कोणत्याही चमत्कारांवर विश्वास न ठेवणे, ग्रंथ प्रामाण्य न मानता व्यक्तीचे मन व विचार याचे स्वातंत्र्य राखणे इत्यादी सम्यकदृष्टीची उदाहरणे सांगता येतील...



सम्यक दृष्टीचे महत्व सांगताना भगवान बुद्ध म्हणतात कि, हे विश्व एक अंधारकोठडी आहे व मनुष्य हा तिच्यातील कैदी आहे, ही अंधारकोठडी गडद अंधाराने भरलेली आहे, अंधार इतका आहे जी, कैद्याला क्वचीतच काही दिसु शकते. कैद्याला आपण कैदी आहे हेही कळत नाही.

खुप काळ अंधारात राहिल्यामुळे मनुष्य केवळ आंधळा होऊन राहिलेला आहे. इतकेच नव्हे तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तु अस्तित्वात असु शकते याबद्दल शंका वाटते.


मन हे साधन आहे की, ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळु शकतो, तथापि या अंधारकोठडीतील कैद्यांच्या मनाची अशी अवस्था नाही कि, त्यांचे मन हे या बाबतीत एक साधन ठरेल. परंतु मानवात इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते. जेव्हा योग्य हेतु निर्माण होतात तेव्हा इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते. कोणत्या दिशेने इच्छाशक्तीला गती द्यावी हे पाहण्याइतकाही मनुष्याला प्रकाश मिळाला तरी तो मनुष्य अशा प्रकारे आपल्या इच्छाशक्तीला गतिमान करु शकेल व शेवटी तो बंधमुक्त होईल.


मन जी गोष्ट निर्माण करते ती ते नष्टही करु शकते. जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळविल्यास त्वाला बंधमुक्त करु शकते. सम्यक दृष्टी जे करु शकते ते हेच होय.


सम्यक दृष्टीचा उद्देश काय आहे..?

अविद्या व मिथ्या दृष्टीचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे.

मनुष्याने कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजणे आणि शास्त्रांच्या पावित्र्यावरील मिथ्या विश्वास टाकुन देणे.

अद्भुत कल्पनांचा त्याग करणे, निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने मानता कामा नये.

ज्या सिद्धांतांना वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही व ते केवळ काल्पनिक अनुमाने आहेत ते सिद्धांत सम्यक दृष्टीसाठी ताज्य आहेत.

स्वतंत्र मन व स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहेत.







२.सम्यक संकल्प :



कोणतीही कृती करण्यापुर्वी आपले मन स्वच्छ व स्पष्ट असावे, ते शुद्ध असावे, ते वाईट विचारांपासुन मुक्त असावे. प्रश्नांची, समस्यांची उकल करताना मन मुक्त असावे. उच्चस्तरांवरुन विचार केल्यास आपले मन संवेदनापासुन, विकृत इच्छा, क्रोध, द्वेष, संशय, चिंता आळस या सर्वांपासुन मुक्त असावे. हे केवळ ध्यान व एकाग्रचित्तने साध्य होईल. त्याचबरोबर आपण मानसिक, प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या बाबीवर मात कर शकतो. प्रत्येक माणवाला काही ध्येये, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा असतात. अशी ध्येये, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय असावी ती क्षुद्र आणि अयोग्य नसावी, हा सम्यक संकल्पाचा आशय आहे.


व्यक्तीने आपली इच्छा, महत्वकांक्षा व ध्येय नेहमी उदात्त आणि चांगले ठेवावे. ज्यामुळे आपले तसेच इतरांचेच कल्याण होईल. तसेच शुद्ध ध्येय असावे. आपली महत्वकांक्षा कोणाच्याही अहितावर आधारित नसावी. शिवाय आपली शक्ती आणि योग्यता आजमावुनच महत्वकांक्षा बाळगावी यालाच सम्यक संकल्प असे म्हणतात. सम्यक संकल्पामुळे कर्त्याच्या पदरी निराशा येत नाही. त्याची जाणीव झाल्यावर कर्त्याला समाधान वाटते. त्यामुळे कर्त्याचे आणि मानवी समाजाचे कल्याण होते. स्वार्थी किंवा दुष्ट संकल्पामुळे शत्रुत्व वाढते. मुर्ख संकल्पामुळे अपयश येऊन जगात हास्य किंवा फजिती होते, जगातील कितीतरी व्यक्तींना स्वःताच्या किंवा इतरांच्या क्रुर महत्वकांक्षेला बळी पडल्यामुळे दुःखाच्या यातना भोगाव्या लागतात.






३.सम्यक वाचा :



सत्य व सभ्यतेने बोलणे, कोणाची निंदा न करणे तसेच कोणाच्या ह्रदयाला इजा होईल असे कठोर न बोलणे म्हणजेच सम्यक वाचा होय. मानवास लाभलेली वाचा ही एक परिमाणकारक शक्ती आहे. तिचा योग्य तोच उपयोग केला पाहिजे. मधुर व शांत वाणीने शत्रुचे मित्र होता. उलट गर्विष्ट उपर्दकारक, वात्रट, ढोंगी आणि इतरांच्या भावना पायदळी तुडविणाऱ्या वाणीने मित्रही शत्रु होतात. म्हणुन प्रत्येक व्यक्तीने वाणीचे शील पाळले पाहिजे. प्रत्येक व्यक्ती आपली मर्यादा व अधिकार ओळखुनच बोलावे, खोटे बोलु नये. चांगले, गोड शब्द आपल्या मुखात ठेवावे. . मित्तभाषा असावी. अश्लील बोलु नये. वाईट बोलण्याने अनेक उत्पाद व कटुता निर्माण होते. वाचेने पवित्र व विश्वास सदोदित रक्षण करावे, योग्यवेळी योग्य शब्द उच्चारावे, अर्थपुर्ण बोलावे. यालाच सम्यक वाचा म्हणतात.



सम्यक वाचा आपल्याला शिकवते कि,

१. माणसाने सत्य तेच बोलावे.
२. असत्य बोलु नये
३. माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलु नये.
४. माणसाने दुसऱ्याची निंदानालस्ती करण्यापासुन परावृत्त व्हावे.
५. माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळाची भाषा वापरु नये.
६. माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे.
७. माणसाने अर्थहीन व मुर्खासारखी बडबड करु नये., त्याचे बोलणे संमजसपणे व मुद्देसुद असावेत..






४.सम्यक कर्मांत :



सम्यक कर्मांत म्हणजे योग्य कृती मनुष्याने आपले कर्तव्य योग्य दिशेने, योग्य वेगाने व जाणीव ठेवुन पुर्ण करावे हा 'सम्यक कर्मांत' होय. आपली वागणुक सदाचारी असावी. लोभाला बळी पडुन बळजबरी, चोरी किंवा व्यभिचार करु नये. सतत कार्य करावे. कार्य चिकाटीने पुर्णत्वास न्यावे. निरुपयोगी किंवा आळशी नसावे. सम्यक संकल्पाला सम्यक कृतीची जोड असल्याशिवाय तो पुर्ण होणार नाही. कोणत्याही चांगल्या ध्येयासाठी वाईट कर्म करु नये. आळस किंवा घाई गडबड टाळुन आपल्या प्रत्येक पाऊल ध्येयसिद्धीकडे टाकल्यास निराशा किंवा अपयश येणार नाही, हि सम्यक कर्मांताची लक्षणे आहेत. कामवासनेच्या बाबतीत योग्य वर्तन असणे हा सम्यक कर्मांतामधील महत्त्वाचा भाग आहे. त्याने कामांध होऊ नये किंवा व्यभिचार करु नये. आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहावे.





.सम्यक आजीविका :




प्रत्येक व्यक्तीला उपजीविकेसाठी साधन असते, हे साधन योग्य असावे हा सम्यक आजीविका चा अर्थ आहे. व्यक्तीने आपली उपजीविका चांगल्या उद्योगधंद्याने करावी. सचोटीने व प्रामाणिकपणाने काम धंदा करुन त्यावर जगावे. आपला उद्योगधंदा समाजाला उपयुक्त असावा. आपल्या धंद्यामुळे कोणाला दुःख होणार नाही, कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. वाईट मार्गाने जसे चोऱ्या करुन, युद्ध करुन, दारु किंवा अपायकारक पदार्थाचे उत्पादन करुन अनीतीला पोषक होतील अशी साधने बनवुन असा एखादा वाईट धंदा करुन त्यावर उपजीविका करु नये. तसेच आळशी राहु नये, परक्याच्या कष्टावर जगु नये. एकुण सम्यक आजीवीका म्हणजे समान उपयुक्त नीतिमान उद्योग करणे व त्याद्वारा आपले जीवन जगणे होय.






६.सम्यक व्यायाम :



सम्यक व्यायाम म्हणजे आपल्या मनाला प्रशिक्षण देण्यासाठी करावयाचे योग्य प्रयत्न होय. व्यक्तीने आपल्या चंचल व ओढाळ मनावर नियंत्रण ठेवुन त्याला शिस्त लावावी. मन भलतीकडे जाणार नाही, मनात अनीतीने कामवासनेचे किंवा वाईट विचार उद्भवणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. आपल्या मनात असलेल्या सद्गुणाची वाढ करणे व नसलेले दुर्गुण जवळ येणार नाहीत याची काळजी घेणे या प्रयत्नांनाच 'सम्यक व्यायाम' असे म्हणतात. सतत योग्य प्रयत केल्यास दृढ मनोनिग्रहाने लागट दुर्गुण किंवा व्यसनांचा त्याग करणे शक्य आहे. सद्धर्माबद्दल श्रद्धा निर्माण होण्यासाठी सम्यक व्यायामाची आवश्यकता आहे.





७.सम्यक स्मृती :



सम्यक स्मृती म्हणजे मनाची जागृअकता. व्यक्तीने आपले मन नेहमी स्मृतीमान ठेवावे. नेहमी विवेक जागा ठेवुन मनाच्या छोट्या मोठ्या हालचालींवर नेहमी ताबा ठेवावा. हीच सम्यक स्मृती होय. मनाची शक्ती फार मोठी आहे, आपण थोडे जरी गैरसावध राहिलो तर ते आपणास कुविचाराकडे घेऊ न जाते म्हणुन आपल्या मनात राग, लोभ, द्व्ष, तृष्णा, मत्सर, इ. विकारांचा उद्रेक न होण्यासाठी व्यक्तीने सतर्क आणि स्मृतिमान राहिले पाहिजे.





८.सम्यक समाधी :



सम्यक समाधी म्हणजे योग्य चिंतन. आर्य अष्टांगिक मार्गातील वरील सात गोष्टींचे आपण अचुक पालन करतो कि नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच सम्यक समाधी सांगितली आहे. दुःक, दुःखाचे कारण, दुःखातुन मुक्तता आणि त्यातील आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन करण्याची आपल्या मनाला नित्य सवय होण्यासाठी सम्यक समाधी उपयुक्त आहे. अशा एकात्म विचाराने अनेक गुंतागुंतीच्या समस्यांच्या उलगडा होतो. जीवनातील अनेक रहस्य व गहन प्रश्न सुटल्यामुळे आपल्या मनाला अद्वितीय आनंद होतो. एकाग्र मनाने केलेले चिंतन म्हणजे सम्यक समाधी होय.

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


Read Also :


१. भगवान बुद्ध : सत्याचा सर्वोत्तम
शिक्षक......


२. बौद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज

३. भगवान बुद्धांचा शीलमार्ग......

४.मराठी धम्मपद

५. बुद्ध वंदना : मराठी

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१३

५७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि बौद्ध समाजापुढे असलेली आव्हाने...

जय भीम मित्रहो, धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या ५७ व्या वर्धापण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली विजयादशमीच्या दिवशी आपल्या लक्षावधी बांधवांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि हजारो वर्षे खितपत पडलेल्या समाजाला सदाचारी जीवन जगण्याचा मार्ग दाखवला.....



ह्या सत्तावन वर्षाच्या कालखंडात बौद्ध झालेल्या आंबेडकरी समाजाने इतर दलीत समाजापेक्षा केलेली कामगीरी अतुलनीय आहे,, असा हा समाज आपले पारंपारिक व्यवसाय सोडुन सर्वर्णांच्या खांद्याला खांदा मिळवुन त्यांच्याशी स्पर्धा करु लागला आहे. पण याची दुसरी बाजु खुप वाईट आहे, त्याबाबत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत.




धम्मचक्रप्रवर्तन दिनापासुन आजपर्यंत हा संपुर्ण समाज बाबासाहेबांच्या विचारांवर त्यांनी सांगीतलेल्या मार्गावर चालण्यात सपशेल अपयशी ठरला आहे. काही बाहेर बुद्ध आणि घरात खंडोबा घेवुन चालत आहेत, तर काही केवळ इतर समाजाप्रती मनामध्ये द्वेष पसरवत चालले आहेत, तर काही नक्षलवादाची वाट धरत आहेत, काही टोकाचे नास्तिक झालेत, ज्यांना धर्म म्हणजे अफुची गोळी वाटते, तर काहींच्या पोटात शिर्डीच्या साईबाबाचे दर्शन घेतल्याशिवाय अन्न जात नाही..... या सर्वांमध्ये आपण बाबासाहेबांनी केलेल्या धर्मचक्रप्रवर्तनाचे मुख्य ध्येय विसरत चाललो आहोत...




यात समाजात द्वेष पसरवणाऱ्या, जहाल व मार्क्सवादी विचारांच्या मार्गावर नेऊ पहाणाऱ्या कथित आंबेडकरी संघटनांमुळे / लेखकांमुळे धर्माला ग्लानी येत आहे.





धम्माचे होणारे राजकीयकरण आधी थांबवा...



डॉ. बाबासाहेबांनी म्हटले होते कि, "शासनकर्ती जमात बनणे हे आमचे उद्दिष्ट व आकांक्षा आहे हे तुमच्या मनात ठसू द्या. तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा." पण काहींनी या वाक्याचा वापर करून समाजाचे भावनिक वशीकरण केले. समाजाला आर्थिक बाबतीत लुटले. लोकांच्या भावनांचे राजकारण केले... आणि त्या घाणेरड्या राजकारणात धर्मालाही गुंफले.



मी संपुर्ण भारत बौद्धमय करेन, हि बाबासाहेबांची शेवटची इच्छा होती,, त्याचेच हे राजकारण करत आहेत. मुळात राजकिय, सामाजिक आणि धार्मिक ह्या तिन्ही प्रकारच्या चळवळी भिन्न आहेत, त्याला एकमेकात मिसळवुन कोणी राजकारण करावे आणि तरूण वर्ग त्याला बळी का पडावा?


अशाप्रकारचा भारतात बौद्ध धर्माचा पुरस्कार करणारे मुळात स्वतःही बौद्ध नसतात,, सत्ता प्राप्त केल्याशिवाय बौद्ध धम्माला राजाश्रय मिळणार नाही, त्याशिवाय भारत बौद्धमय होणार नाही हा विचारच मुळात घटनाविरोधी आहे, सत्तेचा वापर धर्मप्रसारासाठी करणे हे घटनाविरोधी आहे. आपली घटना हि धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करते.... मुळात धम्माला सत्तेची गरजच काय..?


तर काही विद्वान नेते म्हणतात कि,, सत्ता आल्यावर मी बौद्ध धर्माचा स्वीकार करेन. यातुन काहीच बोध घेवु न शकण्यासारखे झालो आहोत का आपण? सत्तेसाठी बौद्ध धर्माचा कोणी स्वीकार करत नाही याला काय म्हणावे?
सम्यक संबुद्धाने उपदेशिलेला धम्म हा सदाचाराचा मार्ग आहे, तो न स्वीकारता धम्मविरोधी कृत्य करुन राजकारणासाठी त्याला वेठीस धरणे म्हणजे धम्म द्रोहच नाही तर समाजद्रोह सुद्धा आहे. हे धम्माचे होणारे गलिच्छ राजकारण आता तरूण पिढीने ओळखणे गरजेचे आहे. तेव्हाच राजकारणाद्वारे धम्माला येणारी ग्लानी दुर होईल..




बौद्ध विहारे प्रत्येक खेड्यापाड्यातुन उभारली पाहिजेत व लाखोंच्या संख्येने बौद्ध वाङ्मयाचा प्रसार झाला पाहिजे.



महाराष्ट्रात बौद्ध समाज प्रत्येक कानाकोपऱ्यात पसरला आहे. आणि त्यामुळे त्यांच्यापरीने जेथे तेथे विहारांची उभारणी झाली. पण त्याने काहीच फायदा झाला नाही, त्या भागात बौद्ध वाङ्मय तर खुप दुरचीच गोष्ट पण बुद्धाचा इतिहास पण माहीत रहात नाही, मग काय तर आजीआजोबांकडुन ऐकलेल्या गोष्टींतुन, टी.व्ही. वर दाखविल्या जाणाऱ्या मालिकांमधुन लहानमुलांच्या कल्पनेतील बुद्ध साकार होतो. पण त्याला काहीच ऐतिहासीक आधार नसतो त्यामुळे, बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार होत नाही उलट धम्माला ग्लानी येते.


वर्षावासाच्या काळात आम्ही अनेक खेड्यापाड्यात जाऊन धम्मप्रचार करत असतो, पण खेड्यांतील विहारांची ती दैयनीय अवस्था पाहुन वाईट वाटते. तर मुळात ती विहारेच नसतात. तर भांडे ठेवण्याची गोडावुन बनलेली असतात. शहरी भागात काही प्रमाणात तीच स्थीती असली तरी मात्र तिथे नियमीत वंदना होत असते, लोक विहारात जातात, ग्रंथपठण करतात, धर्माचे तत्वज्ञान जाणतात. पण मोठ्या प्रमाणात हे होत नाही. यावर उपाय करायला हवेत.



आज खेड्यापाड्यात बौद्ध विहारांची निर्मिती होत आहे, पण ति विहारे केवळ शोभेची वास्तु बनलेली आहेत,, जयंती उत्सवानिमित्त्य लागणारे भांडे ठेवण्याची जागा बनलेली आहेत.....


उर्गेन संघरक्षित यांनी इंग्रजी मध्ये विहार वंदना लिहिली आहे ती याप्रमाणे,,




आम्ही हे क्षेत्र, त्रिरत्नास समर्पण करतो.


मानवाच्या संबोधीप्राप्तीचा आदर्श, अशा बुद्धास, आम्ही हे क्षेत्र, समर्पण करतो.


ज्या धम्ममार्गाच्या आचरणास आम्ही सिद्ध झालो आहोत, त्या धम्मास आम्ही हे क्षेत्र, समर्पण करतो, 


ज्यांचात परस्पर कल्याणमित्रतेचा आनंद आम्ही उपभोगतो, अशा संघास, आम्ही हे क्षेत्र, समर्पण करतो. 


येथे कोणत्याही व्यर्थ शब्दांचे उच्चारण केले जाऊ नये. येथे चंचल विचारांनी आमची मने कंपित होऊ नयेत.


पंचशीलांच्या परिपालनासाठी, ध्यान-साधनेच्या सरावासाठी, प्रज्ञेच्या विकासासाठी, आणि संबोधीच्या प्राप्तीसाठी, आम्ही हे क्षेत्र, समर्पण करतो.


बाह्य जगात जरी द्वेष उफाळत असला,
तरी येथे मात्र मैत्री नांदो. बाह्य जगात जरी दुःख खदखदत असले, तरी येथे मात्र आनंद नांदो.


पवित्र समजल्या जाणाऱ्या ग्रंथाचे पठण करुन नव्हे, किंवा पवित्र समजल्या जाणाऱ्या जलाचे सिंचन करुनही नव्हे. तर संबोधि प्राप्तीसाठी प्रयत्नशील बनुन, आम्ही हे क्षेत्र समर्पण करतो.

या परिमंडलाभोवती, या पवित्र क्षेत्राभोवती, परिशुद्धतेची कमलदले उमलोत.

या परिमंडला भोवती, या पवित्र क्षेत्राभोवती दृढ प्रज्ञेचा वज्रतट उभा राहो.

या पवित्र क्षेत्राभोवती, संसाराचे निर्वाणात परिवर्तन करणाऱ्या अग्निज्वाला उफाळोत.

येथे बसुन, येथे आचरण करुन, आमची मने प्रबुद्ध बनोत. आमचे विचार धम्म बनो, आणि आमचे परस्परातील संबंध संघ बनोत. 

सर्व प्राणिमात्रांच्या सुखासाठी आणि सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी, काया, वाचा आणि मनाने आम्ही हे क्षेत्र समर्पण करतो..




ह्या वंदने प्रमाणे विहारासंबंधीची भावना जेव्हा बौद्धजनांच्या मनात रुजेल,, तेव्हा प्रबुद्ध भारताची सोनेरी सुरुवात होईल....




जयंती उत्सव समीतीच्या ऐवजी धम्म प्रचार केंद्रांची निर्मीती होणे गरजेचे आहे.



यावर्षी आमच्या शहरात 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समीती' नावाची एक समिती निर्माण झाली आहे. ह्या समितीचे प्रायोजन काय तर दरवर्षी लक्षावधी रुपये खर्च करुन आंबेडकर जयंती आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरे करणे. याला काय म्हणावे?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, 'केवळ माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा माझ्या दृष्टीने जे महत्त्वाचे काम आहे ते करा.'


खरच.. आपण उत्सव प्रेमी झालो आहोत, आंबेडकर जयंती आली प्या दारु, नाचा डीजे समोर,, ह्याला म्हणाल काय आंबेडकरवाद्यांची जयंती उत्सव साजरा करण्याची पद्धत? ही असली पद्धत बाबासाहेबांच्या विचारांशी जुळते काय? हे सर्व प्रश्न आधी आपल्या मनाला विचारुन पहा. मग मी तुम्हाला विचारतो कि, अशा समितींची गरजच काय? त्यापेक्षा अशा प्रकारे जो पैसा खर्च होतो, तो धम्मप्रचाराच्या कार्यात लावु शकत नाही का आपण ? म्हणुन अशा समित्यांपेक्षा धम्म प्रचार केंद्रांच्या निर्मिती ची आवश्यकता नाही काय?




बावीस प्रतिज्ञांचे पालन करणे आवश्यक आहे.... एका आदर्श बौद्ध संस्कृतीची निर्मिती करा...


आज आपल्या समाजासमोर सर्वात मोठे आव्हान पुढे ठाकले आहे ते,, सर्वच्या सर्व २२ प्रतिज्ञांचे काटेकोरपणे पालन करण्याचे. आज धम्मचकरप्रवर्तनाच्या इतक्या वर्षांनंतरही आपण त्या अमलांत आणु शकलो नाही. आजही कित्येक लोक आपल्या जुन्या धर्मातील रुढी परंपरांना चिकटुन आहेत,, कित्येक देवीदेवतांचे नवस ते करतात, तर काही लोक फक्त २२ प्रतिज्ञांचे पालन करा म्हणुन ओरडुन सांगतात, पण स्वतः मात्र करत नाही, सांगायचे तात्पर्य हे कि,, २२ प्रतिज्ञा म्हणजे हिंदु द्वेष करणे नव्हे,, तर आपला जुना धर्म त्यागुन नव्या बुद्धाच्या संघात सामील होणे. जेव्हा तुम्ही जुना धर्म त्यागण्याची प्रतिज्ञा करता त्याचसोबत तुम्ही नवा बुद्ध धर्म स्वीकारण्याचीसुद्धा प्रतिज्ञा करता. त्यामुळे बुद्धाचा धर्म तुम्हाला कोणाचाही द्वेष करण्याची परवानगी देत नाही. मग असे तुम्ही का करता.? याचा अर्थ असा कि, तुम्ही हिंदु धर्म त्यागला आहे, पण नवा धर्म स्वीकारला नाही. मग तो केव्हा स्वीकारणार? जर आपण २२ प्रतिज्ञांचे पालन पुर्णपणे करु शकलो तर आपल्या जुन्या धर्माच्या रुढी व परंपरांचा त्याग करु शकु व बौद्ध धर्माच्या आदर्श जीवनप्रणालीने जीवन जगुन आपल्या समाजात एक आदर्श बौद्ध संस्कृती निर्माण करु शकु.....




उठा, जागृत व्हा, अजागृत राहु नका, सैद्धांतिक (धम्मा प्रमाणे) जीवन जगा. दुर्गुणांनी राहु नका. सदाचाराने राहणारे सगळीकडे सुखी राहतात...



दीक्षाभुमी, नागपुर येथे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या सविस्तर भाषणात म्हणाले होते कि,,,


बौद्ध धम्म म्हणजे हिरे, माणिक, मोत्यांची खाण आहे. ही मी तुमच्यासाठीच शोधली आहेत यातील जवाहिरांचा मुक्त वापर करा.

मात्र तुमचीही जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मानसन्मान वाटेल अशी कृती केली पाहिजे. हा धर्म म्हणजे आपण एक गळ्यात मडके अडकवुन घेत आहोत असे मानु नका. बौद्धधर्माच्या दृष्टीने भारताची भुमी सध्या शुन्यवत आहे. आपण महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीला आणला असे होवु नये, म्हणुन आपण दृढनिश्चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्याबरोबर देशाचा इतकेच नव्हे तर जगाचाही उद्धार करु. कारण बौद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे....



पण आज तुम्ही तो निंदाजनक स्थितीत आणुन ठेवला आहे...


भगवान बुद्धांनी दुःख मुक्तीचा मार्ग सांगितला आहे, म्हणजे बुद्धाचे अनुयायी हे दुःखमुक्त असतात,, पण जर तुम्ही स्वतःला बौद्ध आहोत असे समजुन मोठा होरा मिरवता ना.. मग तुम्ही दुःखमुक्त आहात काय? मला सांगा तुमच्यापैकी किती लोक पंचशीलांचे पालन करतात? किती लोक सदाचारी जीवन जगण्याचा प्रयत्न करतात?



तथागतांना वयाच्या पस्तीसाव्या वर्षी वैशाख पोर्णीमेला ज्ञान प्राप्ती झाली आणि आषाढ पोर्णीमेला त्यांनी संघाची स्थापना केली. आणि त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर म्हणजे सुमारे पंचेचाळीस वर्षे त्यांनी धम्मप्रचार केला, आणि अवघ्या पंचेचाळीस वर्षाच्या कालखंडात त्यांनी कित्येक राजा महाराजांना, श्रीमंतांना, उडाणटप्पुंना, डाकुंना, नगरवधुंना धम्मदीक्षा दिली... पण ह्या ५७-६० वर्षांच्या काळात आपण धम्माचा किती प्रमाणात प्रचार आणि प्रसार करु शकलो? बौद्धमय भारत नावाची बाबासाहेबांनी उभी केलेली चळवळ कोणत्या मार्गाने चालली आहे, याची जाणीव आपल्याला आहे काय? हि सर्व सध्या बौद्ध समाजापुढे असलेली आव्हाने आहेत,, आपल्या अशा वागण्यामुळेच धम्माला ग्लानी येत आहे.... त्यावर त्वरीत उपाय योजायला हवेत, अन्यथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या कष्टाने उभी केलेली हि चळवळ बेशुद्ध व्हायला जास्त वेळ लागणार नाही.



भगवान बुद्धांची शिकवण आचरणात आणा,, आपला धर्म (आचरण) शुद्ध तत्त्वावर आधारित असला पाहिजे. भगवान बुद्धांच्या धम्मानुसार वागले तर आपण नक्कीच दुःखमुक्त होणार यात तीळमात्र शंका नाही...
धम्मपदाच्या चतुर सिद्धांतांनुसार वागा आणि आपले आयुष्य दुःखमुक्त करा.....


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


Read Also :


मराठी धम्मपद

श्रमणफळ सुत्ताचा मराठी अनुवाद (राजा अजातशत्रुची धम्मदीक्षा)

बुद्ध धम्म व काही प्रश्नोत्तरे :भाग १

भगवान बुद्ध : सत्याचा सर्वोत्तम शिक्षक......

बौद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज

शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१३

श्रमणफळ सुत्ताचा मराठी अनुवाद (राजा अजातशत्रुची धम्मदीक्षा)



प्रस्तुत लेख हा त्रिपिटकाच्या सुत्त पिटकातील ग्रंथ दीग्घ निकायातील श्रमणफळ सुत्ताचा आहे... येथे राजा अजातशत्रु भगवान बुद्धाला श्रामण्याच्या फळाबद्दल विचारतो....




पौर्णिमेच्या रात्री राजा अजातशत्रु आपल्या अमात्यांसह राजवाड्याच्या गच्चीवर बसला होता. त्या वेळी चंद्रप्रकाशाने सर्व प्रदेशाला अत्यंत रमणीयता आली होती.राजा आपल्या अमात्यांकडे पाहून उद्गारला "आजची रात्र कितीतरी रमणीय आहे! किती तरी सुंदर आहे! या वेळी एखाद्या प्रसिद्ध श्रमणाची किंवा ब्राह्मणाची भेट घेतली असता आमचे मन प्रसन्न होईल. असा श्रमण किंवा ब्राह्मण या राजगृहामध्ये सध्या कोण आहे?''


त्या अमात्यांतील एकजण म्हणाला "महाराज, पूरण काश्यप हा सध्या येथे रहात आहे. पुष्कळ लोकांचा तो गुरू आहे, हे आपण जाणताच.''


दुसरा अमात्य म्हणाला "मक्खलि गोसाल हा फार प्रिसद्ध धर्मप्रवर्तक सध्या येथे आहे. त्याच्या दर्शनाला महाराज गेल्यास तो महाराजांच्या चित्ताचे समाधान करील, असे मला वाटते!''

तिसऱ्या अमात्यानें अजित केसकंबलाच्या दर्शनाला जाण्याविषयीं अजातशत्रूला विनंती केली.

चौथ्याने पकुध कात्यायनाची स्तुती करून राजानें त्याच्या दर्शनाला जावे असे म्हटले.

पाचव्याने संजय बेलठ्ठपुत्राची थोरवी गाऊन त्याच्या भेटीला जाण्याविषयी राजाचे मन वळविण्याचा प्रयत्न केला.

सहाव्याने निर्ग्रंथ नाथपुत्राच्या दर्शनाला जाण्याविषयी राजाला विनंती केली. पण राजा अजातशत्रुने याबद्दल कोणालाही उत्तर दिले नाही. जीवक कौमारभृत्य नावाचा प्रसिद्ध वैद्य मगधराजाच्या दरबारी होता. तो या वेळी अजातशत्रूच्याजवळ बसला होता. अजातशत्रु त्याला म्हणाला "सौम्य जीवक, याबद्दल तु काहीच का बोलत नाहीस?



जीवक म्हणाला "महाराज, सध्या बुद्ध भगवान् माझ्या आम्रवनांत रहात आहेत.जर आपली मर्जी असेल तर आपण त्या भगवंताच्या दर्शनाला जाऊ.''

अजातशत्रु म्हणाला "तर मग हत्ती सज्ज करावयास सांग.''

राजाच्या हुकुमाप्रमाणें जीवकानें पुष्कळ हत्ती आणि हत्तिणी सज्ज करून सगळी तयारी झाली असल्याचे राजाला सांगीतले. राजा प्रत्येक हत्तिणीवर आपल्या अंत:पुरांतील एकेका स्त्रीला बसवून आपण एका उत्तम गजावर आरूढ होऊन आपल्या जीवकादि अमात्यांसहवर्तमान मोठ्या थाटाने बुद्धदर्शनाला निघाला.


आम्रवनाच्या जवळ आल्यावर अजातशत्रु घाबरून गेला, आणि जीवकाला म्हणाला सौम्य जीवक! मला तू फसवीत तर नाहीसना? माझ्या शत्रूच्या हाती देण्यासाठी मला येथे आणले नाहीसना? साडेबाराशे भिक्षूंचा संघ येथें रहात असता एकाचा देखील बोलण्या चालण्याचा शब्द ऐकू येत नाही, हे मोठें आश्चर्य नव्हे काय?''


जीवक म्हणाला "महाराज! भिऊ नका. तुम्हाला फसवून शत्रुच्या ताब्यात देण्यासाठी मी येथे आणले नाही. आपण पुढे व्हा. हे समोरच्या ओसरीवर दिवे जळत आहेत.'' जीवकाच्या आम्रवनाबाहेर आपले हत्ती उभे करून राजा सर्व मंडळीसह भगवान बुद्ध जेथे बसले होते त्या ठिकाणी गेले... जीवकाने राजाला बुद्धाची ओळख करून दिली. परंतु त्याची भेट घेण्यापूर्वीच भिक्षुसंघाची शांत आणि गंभीर चर्या पाहून तो उद्गारला "माझ्या उदायिभद्र कुमार अशा प्रकारच्या शांतीने संपन्न होवो!''


हे राजाचे उद्गार ऐकून बुद्ध म्हणाला "महाराज! तू आपल्या प्रेमाला अनुसरूनच बोललास.'' "होय भगवन्, उदायिभद्र माझा आवडता मुलगा आहे,'' अजातशत्रूने उत्तर दिले, व बुद्धाला आणि भिक्षुसंघाला नमस्कार करून तो एका बाजूला बसला.


एका बाजूला बसल्यावर अजातशत्रु म्हणाला "भगवन्, निरनिराळे योद्धे, न्हावी, स्वयंपाकी, माळी, धोबी, बुरूड, कुंभार, कारकून वगैरे लोक आपापल्या कलेचें इहलोकीचे फळ मिळवत असतात. आपल्या कलेच्या बळावर द्रव्यार्जन करून ते आपला उदरनिर्वाह करतात, आपल्या आईबापांचा सांभाळ करतात. आणि श्रमणब्राह्मणांनां दक्षिणा देऊन परलोकी स्वर्गाचा मार्ग खुला करतात.

पण भगवन्, या लोकांच्या शिल्पाचे जसे प्रत्यक्ष फळ दाखवता येते, तसे श्रामण्याचे प्रत्यक्ष फळ दाखवता येईल काय?''

बुद्ध म्हणाला ''हा प्रश्न तू दुसऱ्या श्रमण ब्राह्मणांनां विचारून पाहिला आहेस काय?''


राजा म्हणाला "होय. एकदा मी पूरण कश्यपाला भेटून हा प्रश्न विचारला. तेव्हा पूरण मला म्हणाला `करणाऱ्याला किंवा करविणाऱ्याला, मारणाऱ्याला किंवा मारविणाऱ्याला, परदारागमन करणाऱ्याला, खोटे बोलणाऱ्याला, किंवा अन्य कोणतेही कर्म करणाऱ्याला त्या कर्मापासून पाप जडत नाही. त्याचप्रमाणें कोणतेंही चांगले कृत्य केले असता पुण्यप्राप्ती होते, ही दृष्टिदेखील खोटी आहे.' याप्रमाणे भगवन्, पूरणकश्यपाला श्रामण्याचे प्रत्यक्ष फळ विचारले असता त्याने आपला अक्रियावाद सांगितला.


''पुन: एकदा मीं हा प्रश्न मक्खलिगोसालाला विचारला होता. तेव्हा तो म्हणाला `प्राण्याच्या शुद्धीला किंवा संक्लेशाला काही कारण लागत नाही. आपल्या प्रयत्नाने मनुष्य मोक्ष मिळत नसतो. मूर्ख किंवा शहाण्या मनुष्याला सर्व योनीत जन्म घेतल्यावर आपोआप मोक्ष मिळणार आहे.'


याप्रमाणे मक्खलिगोसालाला मी श्रामण्य फळासंबंधाने प्रश्न विचारला असता त्याने आपला संसारशुद्धिवाद पुढें केला.


"दुसऱ्या एका प्रसंगी अजित केसकंबालाला मी हा प्रश्न विचारला असता तो मला म्हणाला `बऱ्यावाईट कर्माचे फळ भोगावे लागते, ही गोष्ट खोटी आहे. चार महाभूतांपासून हा देह बनलेला आहे. मनुष्य मृत्यु पावल्यावर पृथ्वीचा अंश पृथ्वींत जातो, वायूचा अंश वायूंत, उदकाचा अंश उदकांत, आणि अग्नीचा अंश अग्नींत जातो; मनुष्याच्या मरणोत्तर काही एक शिल्लक रहात नाही. दानाची प्रशंसा केवळ मूर्ख मनुष्ये करीत असतात; त्यांच्या बोलण्यात काहीच अर्थ नसतो.' याप्रमाणे अजित केसकंबालाला मी श्रामण्य फलासंबंधानें प्रश्न केला असता त्याने आपला उच्छेदवाद प्रतिपादिला.



"भगवन् एकदा पकुध कात्यायनाला मी हा प्रश्न विचारला असता तो मला म्हणाला `पृथ्वि, उदक, तेज, वायु, सुख, दु:ख आणि जीव, हे सात पदार्थ नित्य आहेत. ते कोणींच उत्पन्न केले नाहीत. अर्थात् एकाला दुसरा मारतो किंवा मारवितो, ही गोष्ट खोटी आहे.' याप्रमाणे एकुध कात्यायनाला मी श्रामण्यासंबंधाने प्रश्न केला असता त्याने आपला सप्तपदार्थवाद किंवा अन्योन्यवाद सांगितला.


"नंतर एकदा मी निर्ग्रंथ (जैन) नाथपुत्राला भेटलो व त्याला प्रश्न विचारला, तेव्हा तो मला म्हणाला `निर्ग्रंथ कोणत्याच पापाला शिवत नसतो; सगळ्या पापाचा नाश करण्याचा तो प्रयत्न करतो; सर्व पाप धुऊन टाकतो आणि पापावरणापासून मुक्त राहतो. याला मी चातुर्यामसंवरसंवृत्त असे म्हणतो.' याप्रमाणे निर्ग्रंथ नाथपुत्राला मी श्रामण्य फलासंबंधाने विचारले असता त्यानें आपला चातुर्यामसंवर सांगितला.



संजय बेलठ्ठपुत्राला जेव्हा मी हा प्रश्न विचारला, तेव्हा तो मला म्हणाला `तुम्ही जर परलोक आहे काय असे विचाराल, तर ते मला ठाऊक नाही. परलोक नाही हे देखील मला ठाऊक नाही. प्राण्याला कर्मा प्रमाणे फळ मिळते किंवा नाही, हे मला सांगता येत नाही. तथागत मरणानंतर उत्पन्न होतो किंवा नाही, हेही मी सांगू शकणार नाही. याप्रमाणे बेलठ्ठपुत्राला श्रामण्य फला संबंधाने प्रश्न विचारला असता त्याने आपला विक्षेपवाद (अज्ञेयवाद) सांगितला.


भगवन्, यांच्यापैकी कोणीही माझ्या मनाचे समाधान करु शकला नाही; पण माझ्यासारख्या राजाला श्रमणांचा कोणत्याही रीतीने अपमान करणे प्रशस्त नाही, असा विचार करून या आचार्यांविरुद्ध काही एक न बोलता मी मुकाट्याने माघारा आलो.''



बुद्ध म्हणाला "महाराज, तुझा एखादा दास आपल्या दुर्गत स्थितीला कंटाळून भिक्षु होईल, व मोठ्या साधुत्वाने वागेल. अशा मनुष्याला तू पकडून पुन: दासकर्म करावयाला लावशील काय?''


अजातशत्रु म्हणाला "नाही. अशा मनुष्याला मी माझ्यासमोर आसन देईन; आणि वस्त्रान्नाची त्याला ददात पडू नये, अशी व्यवस्था करीन.''


"तर मग महाराज, श्रामण्याचे हे प्रत्यक्ष फल म्हणता येणार नाही काय?''

"भगवन्, नि:संशय याला श्रमण्याचे प्रत्यक्ष फल म्हणता येईल.''

बुद्ध म्हणाला "एखादा दरिद्री मनुष्य आपल्या अल्प संपत्तीचा त्याग करून भिक्षु होईल, व भिक्षूला पाळावयाचे जे नियम असतात ते सर्व पाळील. पोटापुरत्या अन्नाने आणि देहआच्छादनापुरत्या वस्त्राने तो संतुष्ट होईल, व लोभ, क्रोध, आळस, चंचलता आणि कुशंका या पाच आवरणांपासून आपले चित्त मुक्त करून तो सावधगिरीनें वागेल.


जसा एखादा मनुष्य ऋणांतून मुक्त व्हावा, किंवा भयंकर व्याधींतून मुक्त व्हावा, बंधनागारांतून मुक्त व्हावा, दास्यांतून मुक्त व्हावा, अथवा जंगलांतून सुरक्षितपणे पार पडावा, तसा हा भिक्षु या चित्ताच्या पाच आवरणांपासून मुक्त होऊन सर्व ध्यानाचा लाभ करून घेईल; तेव्हा त्याला प्रत्यक्ष श्रामण्यफल मिळाले, असे म्हणण्यास हरकत राहील काय?''


अजातशत्रु म्हणाला "भगवन्, त्याला नि:संशय श्रामण्याचे फल मिळते, असे म्हणावे लागेल.''


आणखीही निरनिराळ्या मार्गानें बुद्धानें श्रामण्याचे प्रत्यक्ष फल कसे मिळते हे सांगितल्यावर अजातशत्रु बुद्धाला, धर्माला आणि संघाला शरण जाऊन बुद्धोपासक झाला,

आणि म्हणाला "भगवन्, मी मोठा अपराध केला आहे. मी अत्यंत मूर्खपणाने माझ्या धार्मिक पित्याच्या मरणाला कारण झालो, याबद्दल मला पश्चात्ताप होत आहे. भगवन्, या अपराधाची मला क्षमा करा.


''

बुद्ध म्हणाला "महाराज, हा तुझा अपराध झाला, यात संशय नाही; पण या अपराधाबद्दल तुला पश्चात्ताप होत आहे, ही समाधानाची गोष्ट आहे. समाधानाची गोष्ट आहे. आपल्या हातून घडलेल्या अपराधाबद्दल पश्चात्ताप होणे, आणि पुन: तसा अपराध होऊ न देणे, हे आर्यश्रावकाचे कर्तव्य होय.




अजातशत्रु म्हणाला "भगवन्, मी आता जातो. माझ्यामागे पुष्कळ कामे आहेत.''

"ठीक आहे,'' बुद्धाने उत्तर दिले.


अजातशत्रु निघून गेल्यावर बुद्ध भिक्षूंना म्हणाला "या राजाच्या हातून जर पितृहत्येचे पाप घडले नसते, तर येथल्या येथेच याला सोतापत्तिफलाचा लाभ झाला असता!''

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...



Read Also :


१. बुद्ध पुजा : पाली (Buddha Vandana in Pali)

२. बौद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज

३. Buddha Vandana : English

४. बुद्ध वंदना : मराठी

५. भगवान बुद्धांचा शीलमार्ग......

६. मराठी धम्मपद

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१३

बुद्ध धम्म व काही प्रश्नोत्तरे : भाग १

बुद्ध धम्म म्हणजे काय....?




१. बुद्ध धम्म काय आहे?

- बुद्ध या नावाचा अर्थ 'संपुर्ण जागृत' असा होतो. आणि त्यामुळेच बुद्ध धम्म हे जागृत होण्याचे तत्त्वज्ञान असे म्हणतात. हे तत्त्वज्ञान म्हणजे सम्यक संबुद्धाची संपुर्णपणे एक प्रत्यक्ष अनुभुती आहे. सम्यक संबुद्ध म्हणजे एक संपुर्ण जागृत असा.

सिद्धार्थ गौतम नावाच्या मानवाला वयाच्या पस्तीसाव्या वर्षी बुद्धत्त्वाची प्राप्ती झाली होती. आजपासुन सुमारे अडीच हजार वर्षापुर्वी बुद्ध भगवंतांनी सारनाथ येथे पंचवर्गीय परिव्राजकांना पहिला उपदेश करत बुद्ध धम्माची स्थापना केली. आशीयायी राष्ट्रांत बुद्ध धम्म हा एक प्रमुख धर्म आहे. पण अलिकडच्या काळात, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, इत्यादी इतर पाशात्य राष्ट्रांत हा धम्म झपाट्याने पसरत आहे.




२. बुद्ध कोण होता?



- इ.स.पु. ५६३ साली ईशान्य भारतातील एका राजघराण्यात एका राजकुमाराने जन्म घेतला. वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी शाक्य संघाने दिलेल्या शिक्षेमुळे त्याला गृहत्याग करावा लागला.. मनुष्याचे दुःख पाहुन अस्वस्थ झालेला सिद्धार्थ सत्याच्या शोधासाठी घोर अरण्यात गेला. सहा वर्षाच्या शिक्षणानंतर, तपश्चर्येनंतर त्याला ज्ञानप्राप्ती झाली. तो वैशाख पोर्णीमेचा दिवस होता. त्या दिवसापासुन तो राजपुत्र बुद्ध बनला, ह्या विश्वात बुद्ध म्हणुन ओळखला जावु लागला. त्यानंतर पंचेचाळीस वर्षाचा काळात त्या सम्यक संबुद्धाने संपुर्ण विश्वात मानवतेचा प्रसार केला. त्यामुळे त्या महाकारुणिकाचे लाखो अनुयायी बनले. असा हा विश्वाचा प्रकाशाचे वयाच्या ८० व्या वर्षी महपरिनिर्वाण झाले.




३. आपल्या बायको, मुलाला आणि परिवाराला सोडुन संन्यास घेणे हा सिद्धार्थाचा बेजबाबदारीपणा होता काय?



- सिद्धार्थाला आपल्या परिवाराला सोडुन संन्यास धर्म स्वीकारणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. त्याच्यासमोर दोन पर्याय होते, एक म्हणजे त्याचा परिवार आणि दुसरा हे जग.. त्यापैकी त्याने दुसरा पर्याय निवडला. त्याने जगाला करुणा शिकवली. त्याने त्यावेळेस केलेल्या त्यागामुळे आज संपुर्ण विश्वाला त्याच्या तत्त्वज्ञानाचा आधार मिळालेला आहे. त्यामुळे सिद्धार्थाचे ते कृत्य बेजबाबदारपणाचे नव्हते तर मानवाच्या कल्याणा करिता केलेल्या त्यागाचे ते सर्वोत्कृष्ट उदाहरण होते.




४. जर बुद्धाचे महापरिनिर्वाण झाले आहे, तर ते आपल्याला कसे काय मदत करु शकतात?


- फॅरेडे ज्याने विजेचा शोध लावला, तो मरण पावला, पण त्याने शोध लावलेली विज आत्ताही आपल्या उपयोगात येत आहे. लुईस पाश्चर ज्याने असाध्य आजारांवर मात करणार्या लसींचा शोध लावला,, तो आज आपल्या मध्ये नाही, पण त्याने लावलेले शोध आपल्याला मदत करतात. याचप्रमाणे अनेक संशोधक आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांच्या संशोधनांनी आपल्याला कुठुन कुठपर्यंत नेले...


होय. गौतम बुद्ध नावाचा प्रबुद्ध मानव आज आपल्यामध्ये नाही, पण अडीच हजार वर्षांपुर्वी त्याने सांगीतलेले तत्त्वज्ञान आजही आपल्याला मदत करतो. त्याचे उपदेश आजही आम्हाला प्रोत्साहन देतात. त्याचे शब्द आमच्या जीवनाची दिशाच बदलवुन टाकतात. हि अद्वितीय शक्ती इतक्या शतकांत केवळ बुद्धाकडेच आहे.




5. बुद्ध हा ईश्वर होता काय? कि त्याचा पुत्र अथवा देवदुत? त्याने असा कधी दावा केला आहे काय?



- नाही. तो परमेश्वर नव्हता, नाही त्याचा पुत्र अथवा दुत. आणि त्याने असा कधी दावाही केला नाही. ते एक मानव होते पण ते साधे मानव नव्हते तर एक प्रबुद्ध मानव होते. अरहंत, सम्यक संबुद्ध, विद्या व आचरणांनी युक्त असा सुगती प्राप्त केलेला लोकविधु अनुत्तर पुरुषांचा सारथी असा आधार देणारा देव व मनुष्यंचा गुरु भगवान बुद्ध. जर आपण त्याची शिकवण आचरणात आणु शकलो तर आपण सुद्धा बुद्ध बनु शकतो


बुद्धाचा हा खरा मानवी धर्म आहे. बुद्धाने आपण ईश्वराचे अवतार आहोत असे केव्हाही व कोठेही सांगितले नाही. म्हणुनच बौद्धधम्म हा मानवधम्म आहे, मानवाच्या संपुर्ण विकासासाठी तो प्रयत्नशील आहे. तो आमच्यासारख्या आधुनिक व अद्ययावत असलेल्या प्रत्येक मनुष्याला पटकन पटु शकतो. बुद्धाची शिकवण अगदे साध्या व स्पष्ट शब्दात मांडलेली आहे. या धम्मामध्ये मनुष्यास पुर्ण वैयक्तिक स्वातंत्र्य दिले आहे व मानवतेला आणि सदसद्विवेक बुद्धीला पटतील त्याच गोष्टी ग्राह्य मानण्यात आल्या आहेत.




६. जर बुद्ध परमेश्वर नाही, त्याचा संदेष्टा नाही तर आम्ही त्याची पुजा का करतो.?

- याविषायावर सविस्तर लेख वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.. बौद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज




७. धम्म म्हणजे काय?

- धम्म (संस्कृत : धर्म) याचे असंख्य अर्थ आहेत. पण बुद्ध धम्मात त्याचा उपयोग सत्यता, वास्तविकता या अर्थाने केला जातो. धम्म म्हणजे निती. धम्म म्हणजे तथागतांची मौल्यवान शिकवण





८. बुद्ध धम्मात नाताळासारखा महत्त्वाचा सण कोणता?


- परंपरेनुसार, वैशाख पोर्णीमेलाच सिद्धार्थाचा जन्म झाला, सिद्धार्थाला बुद्धत्व प्राप्ती वैशाख पोर्णीमेलाच झाली, आणि बुद्धाचे महापरिनिर्वाण सुद्धा वैशाख पोर्णीमेलाच झाले, त्यामुळे बुद्ध धम्मात या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.





९. बुद्ध धर्माचे वेगवेगळे प्रकार का आहेत?



- आपण साखरेचे विविध प्रकार पाहतो, पण त्यांची चव मात्र गोडच असते. त्यांची निर्मीती वेगवेगळ्या प्रकारे करण्यात येते, त्यामुळे त्यांचा वापरही वेगळ्या प्रकारे केला जातो. बुद्ध धर्माचेही अगदी तसेच आहे, थेरवाद, महायान, वज्रयान, अशा विविध प्रकारे बुद्ध धर्म आज अस्तित्वात आहेत, पण तसे असले तरी सुद्धा त्यापासुन मिळणार्या फळाची चव मात्र सारखीच आहे - स्वांतत्र्याची चव, नैतिकतेची चव.


बुद्ध धर्म सध्या वेगवेगळ्या प्रकारात विभागला आहे, पण हे कसे घडले? बुद्ध धर्माचा उगम भारतात झाला आणि नंतर तो जेथे जेथे गेला तिथे तिथे तेथील परंपरांनुसार तो बदलत गेला म्हणुन प्रत्येक देशात तेथील परंपरांमुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बौद्ध धर्म पहायला मिळतात.


जरी बौद्ध धर्माचे विविध वेगवेगळे प्रकार असले तरी त्या सर्वांचे केंद्रस्थान हे चार आर्य सत्य व आर्य अष्टांगिक मार्ग हेच आहे.


बौद्ध धर्म आणि इतरांमध्ये हाच एक फरक आहे कि,, त्यांच्या शाखा वेगळ्या असल्या, धार्मिक बाबतीत अनेक मतभेद असले तरीही मनभेद नाही. त्यांच्या मनात सर्वांच्या प्रती असीम मैत्री आणि करुणेचं नातं आहे.





१०. काही लोकं म्हणतात कि सर्वच धर्म सारखे आहेत, बुद्धीस्टांना हे मान्य आहे काय?


- धर्म हि खुप व्यापक आणि संकुचित सुद्धा संकल्पना आहे त्याचा अर्थ कोणी कसा घ्यावा हे त्यावर अवलंबुन असते. बुद्धीस्टांच्या मते विचार केल्यास त्यांच्यानुसार हे सत्यही असु शकेल अथवा असत्यही...

बौद्ध धर्म शिकवतो कि जगाचा सृष्टीनिर्माता परमेश्वर नाही, पण ख्रिस्ती, इस्लाम, यहुदी, हिंदु, इत्यादी धर्म सांगतात कि, जगाचा निर्माता सर्वशक्तिमान ईश्वर आहे. बौद्ध धर्म शिकवतो कि, प्रत्येक व्यक्ती ज्याचे मन स्वच्छ व निर्मळ आहे तो निर्वाण प्राप्त करु शकतो, पण ख्रिस्ती धर्म शिकवतो कि मोक्ष मिळवायचा असेल तर त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारावा, आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्यावरच अटळ श्रद्धा ठेवावी अन्यथा मोक्ष मिळणार नाही, याचप्रमाणे यहुदी धर्म शिकवतो कि मोझेस व विश्वास ठेवावा, इस्लाम सांगतो कि मुहम्मद हेच ईश्वराचे खरे दुत आहेत, इत्यादी, त्यांनाच सत्य माना अन्यथा मेल्यानंतर स्वर्ग मिळणार नाही.



मी माणसांच्या जिभांनी बोललो व देवदूतांच्यासुद्धा भाषेत बोलणे मला शक्य असेल, माइया ठायी प्रीति नसली तर मी वाजणारी थाळी किंवा मोठा आवाज करणारी झांज आहे.
जर मला देवासाठी संदेश देण्याची शक्ति असली आणि मला सर्व रहस्ये माहीत असली, सर्व दैवी ज्ञान असले आणि डोंगर ढळविता येतील असा दृढ विश्र्वास असला, परंतु माइया ठायी प्रीति नसली, तर मी काहीच नाही. आणि मी जर माझे सर्व धन गरजवांताच्या अन्नदानासाठी दिले आणि मी माझे शरीर जाळण्यासाठी दिले पण जर माइयात प्रीति नसली, तरी मी काहीच मिळवीत नाही. प्रीति गर्व करीत नाही.प्रीति सहनशील आहे, प्रीति दयाळू आहे, ती हेवा करीत नाही. प्रीति बढाई मारीत नाही. ती गर्वाने फुगत नाही. ती अयोग्य रीतीने वागत नाही. ती स्वार्थी नाही, ती चिडत नाही. तिच्याविरुद्ध केलेल्याची नोंद ती ठेवीत नाही, वाईटात ती आनंद मानीत नाही. परंतु सत्याविषयी इतरांबरोबर ती आनंद मानते. सर्व काही खरे मानण्यास सिध्द असते....



बौद्ध धम्म हाच सदाचार शिकवतो फरक इतकाच आहे कि ख्रिस्ती धर्माचा केंद्रबिंदु ईश्वर आहे तर बौद्ध धर्माचा केंद्रबिंदु मानव. ख्रिस्ती धर्मात ईश्वराच्या भितीने सदाचारी व्हावं लागतं तर बौद्ध धर्मात ईश्वराला स्थानच नाही, त्यामुळे त्याचा प्रश्न इथे येतच नाही.






११. बौद्ध धर्म विज्ञानवादी आहे काय?


- सर्वप्रथम विज्ञान म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ काय होतो? मी डिक्श्नरी बघितली तर तिथे लिहिलं होतं Knowledge can be made into a system which depends upon seeing and tasting facts and stating general and natural laws, a branch of such knowledge, anything that can be studied exactly. या व्याख्येत बुद्ध धर्म बसतो काय? नक्कीच... होय. चार आर्यसत्य ही बुद्ध धर्माची प्रमुख शिकवण आहे. बौद्ध धर्माचा आपण अभ्यास केल्यास आपल्याला कळुन येईल बौद्ध धर्म हा खराखुरा विज्ञानवादी धर्म आहे.


प्रसीद्ध कालाम सुत्तामध्ये भगवान बुद्ध म्हणतात,,, हे कालामांनो, तुम्ही जे ऐकता त्यावर विश्वास ठेवु नजा. जे केवळ पुष्कळ लोक सांगतात म्हणुन त्यावर विश्वास ठेवु नका, जे धर्मपुस्तकात लिहिलेले आहे म्हणुन त्यावर विश्वास ठेवु नका. जे केवळ तर्कशास्त्रानुसार आहे म्हणुन ते मानु नका. जे केवळ न्यायशास्थानुसार आहे म्हणुन ते मानु नका. जे केवळ सकृदर्शनी पटण्यासारखे आहे म्हणुन त्यावर विश्वास ठेवु नजा. जे बाह्यात्कारी सत्य म्हणुन त्यावर विश्वास ठेवु नका. एखादे वचन कोणा एका आचार्याने सांगीतले एवढ्यानेच त्यावर विशास ठेवु नका. जे केवळ ऐकीव आहे, परंपरागत आहे, ज्यात केवळ वादविवादाची कुशलता आहे किंवा तर्काची सुक्ष्मता आहे., तेवढ्यावरुनच त्यावर विश्वास ठेवु नका. जे केवळ वरवर पाहता विश्वसनीय वाटते म्हणुन मानु नका. ज्या समजुती आणि दृष्टीकोण केवळ अनुकुल वाटतात म्हणुन स्वीकारु नका. ते विद्वानाचे शब्द आहेत म्हणुन त्यावर भाळुन जाऊ नका, जेव्हा तुम्हांला आत्मानुभवाने वाटेल की, ह्या गोष्टी अहितकर, दोषार्ह, सुज्ञांनी निषिद्ध ठरविलेल्या किंवा परिणामी कष्टात आणि दुःखात नेणार्या आहेत, तेव्हा त्या गोष्टींचा तुम्ही त्याग केलापाहिजे. उपदेशिलेले विचार किंवा दृष्टीकोण हितकर आहेत कि निंदनीय आहेत, सदोष आहेत कि काय, कल्याणकारक आहेत कि अकल्याणकारक यांचा विचार करा. य्ब कसोटीवर उतरणारा कोणाचाही उपदेश मान्य करावयास हरकत नाही.


इतकेच नव्हे तर बौद्ध धर्माची शिकवण आणि सिद्धांत आधुनिक, बुद्धीसुसंगत आणि सदा समकालीन आहेत काहीच कट्टरपण नाही, त्यामुळे असे ठामपणे म्हणु शकतो कि बौद्ध धर्म हा विज्ञानवादीच नसुन त्यापेक्षाही पुढे आहे.

वैज्ञानीक अल्बर्ट आईनस्टाईन यांनी तर भगवान बुद्धाला जगातील पहिला वैज्ञानीक असे संबोधले होते.



"भविष्याचा धर्म हा विश्वव्यापी धर्म राहणार आहे. त्यामुळे माणसाचा वैयक्तिक ईश्वर मागे पडून आणि धार्मिक कट्टरता तसेच धर्मशास्र या गोष्टी मागे पडतील. तो धर्म भौतिक आणि आध्यात्मिक या दोन्ही विषयांना व्यापेल आणि तो धार्मिकदृष्टीने भौतिक आणि आध्यात्मिक बाबीँचे ऐक्य निर्माण करणारा अर्थपूर्ण असेल. बौध्द धर्म हा वरील कसोट्यांना पूर्णपणे उतरतो आणि जर कोणता धर्म आधूनिक विज्ञानाच्या कल्पनांशी सूसंगत असेल तर तो बौध्द धर्मच होय. बौद्ध धर्मात मानवाला व आधुनिक विज्ञानाला पडलेल्या सर्व गरजा भागविण्याचे सामर्थ्य आहे. माझा जन्म ख्रिश्चन धर्मात झालेला असला तरी मी धार्मिक व्यक्ति नाहीय. परंतू जर मी तसा(धार्मिक) झालो तर मी बौध्दच होईल !"


--अल्बर्ट आइनस्टाईन




बुद्धाचा धर्म म्हणजे नीती. बौद्ध धर्मात देवाची जागा नीतीने घेतली आहे. बौद्ध धर्म हा समतेसाठी उभा आहे. जर धर्म चालु राहावयाचा असेल तर तो बुद्धिप्रामाण्यवादी असला पाहिजे. विज्ञान हे बुद्धिप्रामाण्यवादाचे दुसरे नाव आहे.



१२.बौद्ध धर्म आणि हिंदु धर्म एकच आहेत काय?


- नाही. बौद्ध धर्म आणि हिंदु धर्म एकच आहे असे मानणे अगदी चुकीचे आहे..

बौद्ध धर्म व हिंदु धर्म यांची तुलना केल्यास आपणास असे दिसुन येते कि बौद्ध धर्माचा पाया नैतिक आचरण हा असुन हिंदु धर्माचा पाया कर्मकांडांचे आचरण हाच आहे. स्नानसंध्या, जपजाप्य, सोवळेओवळे व यज्ञयाग यात हिंदु धर्म सामावलेला आहे. तर केवळ नैतिक आचरण म्हणजेच बौद्ध धर्म होय. बौद्ध धर्मात देव नाही ही करी गोष्ट आहे. देवाची जागा बौद्ध धम्मात नैतिक आचरणाने भरुन काढलेली आहे. तत्कालीन ऐतिहासीक परिस्थीतीमुळे बौद्ध व हिंदु या दोन्ही परंपरांमध्ये सारख्या शब्दांचा वापर करण्यात आला.. उदा. कर्म, समाधी, निर्वाण आणि ह्या सर्व शब्दांचा उगम भारतातच झाला. त्यामुळे काही लोक समजतात कि, दोन्ही परंपरांमध्ये ह्या गोष्टी सारख्या अर्थाने वापरण्यात आल्या, पण तसे काही नाही, दोन्ही परंपरांमध्ये या संकल्पना अगदी वेगळ्या आहेत. उदा. हिंदु धर्म ईश्वरावर विश्वास ठेवतो तर बौद्ध धर्म ईश्वराचेअस्तित्व नाकारतो. जातिव्यवस्था हा हिंदु धर्माचा मुख्य आधार आहे, तर बौद्ध धर जातिव्यवस्था नाकारतो. कर्मकाण्ड हा हिंदु धर्माचा अविभाज्य अंग आहे, पण बौद्ध धर्म कर्मकाण्डासाठी बौद्ध धर्मात जागा नाही.


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...



Read Also :


१. बुद्ध पुजा : पाली (Buddha Vandana in Pali)

२. बौद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज

३. Buddha Vandana : English

४. बुद्ध वंदना : मराठी

५. भगवान बुद्धांचा शीलमार्ग......

६. मराठी धम्मपद