गुरुवार, १४ मे, २०१५

राष्ट्राची एकता आणि एकात्मताच राष्ट्राचे संरक्षण करते....

          आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. आपल्या देशामध्ये विविध जाति, संप्रदाय आणि वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक राहतात. अशा विविधतेमध्ये सुध्दा आपल्या देशाच्या नागरीकांमध्ये असणारी एकात्मतेची आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाच्या ज्योतीला अखंडपणे तेवत ठेऊन आहे. परंतु असे असतांना देखील, आपल्या देशातील काही समाज कंटक जाति - संप्रदायाच्या नावाखाली, भाषा - प्रदेशाच्या नावाखाली, एका भारतीयाला दुसऱ्या भारतीया पासून वेगळे करीत आहेत, दोन व्यक्तींमध्ये निरर्थक भांडणे लावली जात आहेत. वास्तवात हा एक देशद्रोह आहे. समाज कंटकांच्या ह्या दुष्कृत्यांमुळे देशाच्या सार्वभौमिकतेला धोका पोहोचलेला आहे. अशा घटनांमुळे शेकडो राज्ये उध्वस्त झालेली आहेत, याचे प्रमाण इतिहासात बरेच आहे, भारताच्या गुलामगिरीचा इतिहास तर अशाच गोष्टींमुळे रंगलेला आहे, याबाबतीत एक महत्वाचे उदाहरण म्हणजे वज्जींचे राज्य.

          भगवान बुद्धांच्या काळामध्ये त्यावेळी वज्जी नावाचे लोक अस्तित्वात होते, वैशाली हे  वज्जींच्या राजाधांचे शहर होते. वज्जीना लिच्छवी असे म्हणत. लिच्छवी हे भगवान बुद्धांचे अनुयायी होते, त्यामुळे त्यांचा युध्दामध्ये पराभव होऊ नये यासाठी भगवान बुद्धांनी त्यांना सात वृध्दिकारक धर्मांचा उपदेश केला, याचा संदर्भ अंगुत्तर निकायातील सारन्दद सुत्तामध्ये मिळतो. ते सात वृध्दिकारक धर्म खालीलप्रमाणे :

१. जेव्हापर्यंत वज्जी अखंडपणे एकत्र जमत राहतील, विशाल संख्येने ऐक्य राखतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल, ऱ्हास होणार नाही.

२. जेव्हापर्यंत ते एकत्र जमत राहतील, एकजुटीने बैठकीतून उठतील, आणि एकजुटीने वज्जींच्या प्रजेच्या प्रती त्यांची असलेली सर्व कर्तव्ये पूर्ण करतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल ऱ्हास होणार नाही..

३. जेव्हापर्यंत ते कायदा म्हणून न ठरविलेल्या गोष्टींना कायदा म्हणून अमलात आणणार नाहीत, कायदा म्हणून ठरविण्यात आलेल्या गोष्टी मोडणार नाहीत, आणि पूर्व परंपरेने ठरविलेल्या कायद्या प्रमाणे वागतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल ऱ्हास होणार नाही.

४. जेव्हापर्यंत वडिलधाऱ्या लोकांचा ते मान राखतील आणि त्यांचा सल्ला ते नेहमी ऐकतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल ऱ्हास होणार नाही.

५. जेव्हापर्यंत महिलांना आणि तरुणींना जबरदस्तीने आणून आपल्या घरामध्ये ठेवणार नाहीत, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल ऱ्हास होणार नाही.

६. जेव्हापर्यंत ते गावात असलेल्या किंवा गावाबाहेरच्या चैत्यांचा गौरव करतील व सर्व धर्म कर्तव्ये पार पाडतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल ऱ्हास होणार नाही.

७. जोपर्यंत ते अर्हन्तांचे रक्षण करतील, त्यांच्या राज्यात अर्हंत सुखात राहतील, तेव्हापर्यंत त्यांची भरभराट होईल ऱ्हास होणार नाही.

        वरील वृध्दिकारक धर्मांचे पालन जेव्हापर्यंत वाज्जिंकडून केले जाईल तेव्हापर्यंत त्यांचा ऱ्हास होणार नाही, याउलट भरभराटच होईल. परंतु जर वज्जी या नियमांच्या पासून भरकटले, दुसऱ्या मार्गावर गेले तर त्यांचा नाश होईल, असे भगवान बुध्दांनी त्यांना सांगितले.

          यातील पहिला धर्म आपल्याला एकात्मतेची शिकवण देतो, वज्जी लोक जेव्हापर्यंत राष्ट्राच्या संबंधित कोणत्याही गोष्टीवर चर्चा करण्यासाठी एकत्र जमतील, आणि आपल्यामध्ये ऐक्य राखतील तर त्यांची भरभराटच होईल, ऱ्हास होणार नाही. कारण एकतेची शक्ती भव्य आहे, जरी शत्रू कितीही शक्तिमान असला तरी एकात्मतेची भावना असलेल्या समाजा विरुध्द युध्द करणे आहे त्याला जिंकणे कठीण असते. परंतु याउलट जर समाजामध्ये ऐक्याची भावना नसेल, दोन व्यक्तींमध्ये जाती - संप्रदाया वरून, भाषा - प्रदेशावरून किंवा अन्य दुसऱ्या कोणत्याही कारणावरून तेढ असेल तर त्या समाजाला, त्यां राष्ट्राला बाहेरच्या शत्रूंची गरजच काय..? राष्ट्रातील नागरिकांचे ऐक्य राष्ट्राच्या रक्षणासाठी महत्वाचे आहे. म्हणून राष्ट्राच्या हिताची कामना करणाऱ्यांनी एकत्र येऊन राष्ट्राच्या हितासाठी महत्वाच्या असणाऱ्या गोष्टींबाबत चर्चा करावी असे भगवान बुध्द आपल्याला सुचवितात. आणि केवळ चर्चा करण्यासाठी एकत्र येणे महत्वाचे नाही तर चर्चा करतांना जरी मतभेद निर्माण झाले तरी त्याचा राष्ट्राच्या एकात्मतेवर आणि प्रजेच्या हितावर विपरीत परिणाम होता कामा नये, तर प्रजेच्या प्रती असलेली सर्व कर्तव्ये त्यांनी पार पाडावी, त्यासाठी आपापसांमध्ये नेहमी ऐक्य राखावे आणि त्या ऐक्यामध्ये मतभेदांना आणू नये असे भगवान बुध्द दुसऱ्या धर्माद्वारे सूचित करतात.

          तिसरा धर्म कायद्या प्रमाणे वागायला शिकवितो, कायद्याचे पालन करायला शिकवितो. कायदे हे प्रजेचे कल्याण लक्षात ठेऊन देशाच्या हितासाठीच निर्माण केले असतात, जेव्हापर्यंत ह्या कायद्यांचे प्रजेद्वारे पालन होत राहील, यात कोणावरही अन्याय  होता कामा नये. प्रजा आणि राजा दोघेही वडिलधाऱ्या लोकांचा मान राखतील, पूर्व परंपरेने चालत आलेल्या चांगल्या गोष्टींबाबत कृतज्ञ राहतील. त्यांच्या अनुभवांचा योग्य तो वापर करतील तर त्यांची नेहमी भरभराटच होईल, ऱ्हास होणार नाही, असे भगवान बुध्द तिसऱ्या आणि चौथ्या धर्माद्वारे सांगतात.

          पाचवा धर्म स्त्रियांच्या बाबतीत असणाऱ्या पुरुषी मानसिकतेचा आहे, ज्या समाजामध्ये स्त्रियांना मानाचे स्थान नाही, स्त्रिया उपभोगाची वस्तूच समजली जाते, त्या समाजाचा नेहमी ऱ्हासच होत असतो. स्त्रीया मग त्या कोणत्याही पक्षातल्या का असेनात, जो समाज स्त्रियांचे चारीत्र्य जपतो, त्या समाजाची सदैव भरभराटच होत असते. तर सहावा धर्म प्रजेच्या चारित्र्याबाबतचा आहे, प्रजेने नेहमी धार्मिकच असावे अधर्मी असता कामा नये, तो जाती - संप्रदायाच्या, भाषा - प्रदेशाच्या, वर्ण - वंशाच्या निरर्थक वादा मध्ये पडून एका माणसाला दुसऱ्यापेक्षा कनिष्ठ समजून त्याचा अपमान करता कामा नये. त्याने सर्वांना समान समजले पाहिजे, सर्वांशी स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायानेच वागले पाहिजे अर्थात धार्मिक कर्तव्ये पूर्ण केली पाहिजेत, प्रत्येकाच्या मनामध्ये धर्म वसला पाहिजे, अधर्म वसता कामा नये, असे भगवान म्हणतात. अर्हन्तांचे रक्षण करावे, अरहन्त निर्माण होतील, अर्हन्तांना विहार करण्यासाठीचे अनुकूल वातावरण निर्माण करावे असे सातवा धर्म सांगतो. कारण अर्हंत अशाच प्रदेशां मध्ये विहार करतात, ज्या प्रदेशातील नागरिकांच्या मनामध्ये धर्म वसतो, त्या प्रदेशामध्ये धर्म वसतो, जो प्रदेश धर्म राज्य असतो. अशा धर्म राज्यातील नागरिक नैतिक आचार विचारांचेच असतील, त्यांच्या मनामध्ये अधर्म येणार नाही. ते लोक स्वार्थासाठी एक दुसऱ्यांचा द्वेष करणार नाहीत, राष्ट्राबद्दल फितुरी करणार नाहीत.  त्यामुळे हे सर्व घटक राष्ट्राच्या समृध्दीसाठी कारणीभूत ठरणारे आहेत.  ह्या सर्व वृध्दिकारक धर्मांचे पालन केल्याने राष्ट्राचे अखंडत्व अबाधित राहित, शत्रू आपल्याला पराजित करू शकणार नाहीत आणि आपल्या देशाची भरभराटच होईल ऱ्हास होणार नाही. याउलट जर कोणी ह्या नियमांचे पालन करणार नाहीत तर राष्ट्राचा ऱ्हास निश्चितच होईल.

          वज्जींचे राष्ट्र ह्या नियमांचे काटेकोरपणे पालन करायचे त्यामुळे त्यांचे सार्वभौमत्व टिकून होते, बलाढ्य राज्ये त्यांचा पराभव करू शकत नव्हती. हि गोष्ट जेव्हा मगधचा राजा अजातशत्रूला समजली तेव्हा त्याच्या मनामध्ये वज्जींचे वैभवशाली राष्ट्र जिंकण्याच्या महत्वकांक्षेने जन्म घेतला. वैशालीवर आक्रमण करण्याची हि योग्य वेळ आहे का..? याबाबतीत विचारणा करण्यासाठी अजातशत्रूने आपला अमात्य वस्सकार नावाच्या ब्राह्मणाला भगवान बुद्धांकडे पाठवितो. भगवान बुध्दांना भेटल्यावर वस्सकार ब्राह्मण त्यांना याबाबतीत विचारतो तेव्हा भगवान वस्सकाराला म्हणतात, "एकदा मी वैशाली शहरातील सारदद चैत्यामध्ये विहार करीत असतांना वज्जीना सात वृद्धीकारक धर्मांचा उपदेश केला होता. जेव्हापर्यंत ब्राह्मणा, हे वृध्दिकारक धर्मांचे ते पालन करतील तेव्हापर्यंत त्यांची भरभराटच होईल ऱ्हास होणार नाही." भगवानांनी असे सांगितल्यावर वस्सकार ब्राह्मण म्हणाला, "वज्जींच्या ठिकाणी यातील एकेकच धर्म जरी असला तरी त्यांची भरभराटच होईल, ऱ्हास होणार नाही. तर मग सातही धर्म असल्यावर कसली शंका..? लाच दिल्याशिवाय किंवा त्यांच्यामध्ये फुट पाडल्याशिवाय अजातशत्रू राजाला त्यांचा पराभव करणे शक्य नाही..."  याबाबतीतील संदर्भ अंगुत्तर निकायातील वस्सकार सुत्तामध्ये सापडतो, हाच उतारा दिघ निकायाच्या महापरीनिब्बान सुत्ताच्या पहिल्या भागामध्ये आलेला आहे.

          भगवान बुध्दांशी चर्चा केल्यानंतर सध्या वज्जींवर आक्रमण करण्यात काहीही फायदा नाही, वज्जी जोपर्यंत सात वृध्दिकारक धर्मांचे पालन करत राहतील तेव्हापर्यंत त्यांचे राज्य जिंकणे अशक्य आहे, तेव्हा त्यांना सरळ मार्गाने जिंकता येणार नाही, एकतर लाच देऊन किंवा त्यांच्यामध्ये फुट पाडून, त्यांच्यामध्ये असणारी एकात्मता नष्ट करूनच वज्जींना जिंकता येईल, हे वस्सकार आणि अजातशत्रू ने जाणले होते. तेव्हा त्यांनी यावर चर्चा करून वज्जींना लाच देण्यापेक्षा त्यांच्या मध्ये फुट पाडण्याचा मार्ग निवडला.

          राजाने सभेमध्ये वैशालीवर आक्रमण करण्याचा प्रश्न उपस्थित केल्यावर त्यांच्या ठरलेल्या प्रमाणे, वस्सकार त्यांना म्हणाला वज्जी लोकांना शांततेने शेती, व्यापार करू द्या. तुम्ही त्यांना त्रास कशाला देता..? तेव्हा हा ब्राह्मण वज्जींची बाजू घेत आहे असे म्हणून त्याच्यावर आरोप केला. त्यानंतर ब्राह्मणाने वज्जीना काहीतरी नजराणा पाठविला. आणी तो राजाने पकडला. हा ब्राह्मण देशद्रोही आहे असा आरोप ठेऊन राजाने ठरल्या प्रमाणे ब्राह्मणाला कैद किंवा मारहाण न करता राज्यातून हाकलून दिले. यावर ब्राह्मण म्हणाला, "मी तुझी सर्व बलस्थाने आणि दुर्बलस्थाने जाणतो, लवकरच मी याचा प्रतिशोध घेईन..." असे म्हणत तो निघून गेला.

          हि गोष्ट जेव्हा वैशालीच्या लिच्छविंना माहित झाली तेव्हा ते म्हणाले, "ह्या लबाड ब्राह्मणाला गंगा पार करू देऊ नका." परंतु त्यांच्यातील काही म्हणाले, "अरे आपल्या बाजूने बोलल्यामुळेच ह्या ब्राह्मणावर आज हि पाळी आलेली आहे. तेव्हा त्याला येऊ द्या.." ब्राह्मण जवळ आल्यावर लिच्छविंनी त्याची विचारपूस केली. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, "अजातशत्रूच्या राज सभेमध्ये तुमची बाजू घेतली म्हणून राजाने मला त्याच्या राज्यातून हाकलून लावले आहे." ब्राह्मणाच्या गोष्टींमध्ये फसून भोळ्या लिच्छविंनी त्याला आपल्या राज्यातील अमात्य पद देऊ केले.

          त्यानंतर त्याने लिच्छवीमध्ये फुट पाडण्याचे कार्य सुरु केले. त्याने हे कार्य कशाप्रकारे केले ह्याबाबतीत अठ्ठकथांमध्ये विस्तृत वर्णन केले आहे, ते आपण वाचून घ्यावे. तीन वर्षांच्या कालावधी मध्ये ब्राह्मणाने फुट पाडण्याचे कार्य पूर्ण केले आणि अजातशत्रूला निरोप पाठविला कि, वज्जींवर आक्रमण करण्याची हीच योग्य वेळ आहे. वैशालीच्या लिच्छविंना जेव्हा समजले कि अजातशत्रू आपल्यावर हल्ला करण्यासाठी येत आहे, तेव्हा त्याला अडविण्यासाठी नगारा वाजविण्यात आला. परंतु एकतेमध्ये झालेल्या भंगामुळे वैशालीचे राजे एकत्र जमले नाही. राजाला शहरामध्ये प्रवेश करू द्यायचा नाही, त्यासाठी त्याचा एकत्रितपणे प्रतिकार करू असे म्हणून सुध्दा नगारा वाजविण्यात आला, परंतु तसेही घडले नाही. त्यामुळे अजातशत्रूने नगरामध्ये प्रवेश केला आणि वज्जींचे राज्य जिंकून घेतले. अशाप्रकारे वरील सात वृध्दि कारक धर्मांचे पालन न केल्यामुळे वज्जींच्या राज्याचा ऱ्हास झाला.

          अशा प्रकारच्या पराभवाचा हा केवळ वज्जींचा इतिहास नव्हता, संपूर्ण भारत वर्षाच्या गुलामगिरीचा इतिहास सुध्दा अशाच प्रकारे रंगलेला आहे. वस्सकार ब्राह्मणाने ज्याप्रमाणे वज्जींचा मित्र म्हणवून घात केला, त्यांच्या एकात्मतेमध्ये फुट पाडली, त्यांच्या मध्ये विविध कारणांनी भांडणे लावून दिली. त्याचप्रमाणे आज आपल्या देशा मध्ये सुध्दा विविध कारणांनी भांडणे लावून आपल्या राष्ट्राची एकात्मता भंग करण्याचा प्रयत्नच काही समाज कंटाकांच्या द्वारे केला जात आहे, त्यामुळे सर्व राष्ट्रप्रेमी बंधू आणि भगिनींना माझे असे निवेदन आहे कि, अशा समाज कंटाकांच्या पासून नेहमी सावध राहावे. कोणी जात, संप्रदाय, प्रांत, वंश, भाषा, इत्यादींच्या नावावर कितीही भेद निर्माण करण्याचा जरी प्रयत्न केला तरी आपल्यातील एकात्मतेची भावना लोप पावता कामा नये, आपण एक राष्ट्र आहोत आणि एक राष्ट्र म्हणूनच जगले पाहिजे....

आपण सर्वप्रथम भारतीय आहोत

आणि अंतिमतः भारतीयाच आहोत


          भगवान बुध्दांचा हा उपदेश त्यांच्या श्रावकांच्या साठी सुद्धा आहे.  जेव्हापर्यंत त्यांनी सांगितलेल्या धर्माचे त्यांच्याद्वारे आचारण केल्या जाईल, तेव्हापर्यंत त्यांची भरभराटच होईल ऱ्हास होणार नाही. पण जर त्यांचे चित्त धर्मापासून ढळले आणि अधर्माच्या मार्गावर लागले तर त्यांचा सुध्दा वज्जींसारखा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही....

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...

सुचना : आम्हाला असे आढळून आले आहे कि या ब्लॉग वरील अनेक लेख काही लोक कॉपी करून स्वतःच्याच नावावर शेयर करीत कॉपीराईट कायद्याचे सर्रास उल्लंघन करतात, त्या सर्वांना आमचे सांगणे आहे कि ह्या ब्लॉगवरील काहीही मजकूर कॉपी करण्यापूर्वी आमची परवानगी घेणे आवश्यक आहे. सर्वांनी याची नोंद घ्यावी.....


हे सुध्दा वाचा : 

शुक्रवार, ८ मे, २०१५

धर्माची व्याख्या.....


धर्म हा आपल्या भारतीयांचा सर्वात जवळचा शब्द आहे. आज कित्येक लोक स्वतःला धार्मिक समजणारे आहेत, तसेच धर्माला शिव्या देणारे सुध्दा भरपूर आहेत. परंतु वास्तविक पाहता यांच्यापैकी कित्येक लोकांना धर्माचा खरा अर्थच माहित नाही. त्यांच्यातही जे स्वतःला धार्मिक आणि महाधर्माभिमानी सांगतात ते अज्ञानामुळे त्यांच्या अधर्माला सुध्दा धर्म असे म्हणतात, खरंतर स्वतःला धर्माभिमानी समजणारे लोक धर्माच्या सांप्रदायिक भावना जोपासत असतात कारण धर्म द्वेष करायला शिकवित नाही, धर्म जगावर प्रेम करायला शिकवितो.

साधारणतः 'धर्म' ह्या शब्दाचा अर्थ आपण रिलीजन किंवा संप्रदाय असा घेतो. संप्रदाय म्हणजे धर्म नव्हे. प्रत्येक व्यक्तीचा हा स्वतःचा असा एक वैयक्तीक धर्म असतो, जो त्याच्या जन्मावरून नव्हे तर शरीर, वाणी आणि मनाने केल्या जाणाऱ्या कर्मावरून ठरत असतो. याउलट रिलीजन किंवा संप्रदाय हा जन्माधारीत असतो, जो व्यक्ती कोणत्या कुटुंबात जन्मला यावरुन ठरतो, जसे मुस्लीम मातापित्यांचा मुलगा मुस्लीम, ख्रिश्चन मातापित्यांचा मुलगा ख्रिश्चन, इत्यादी, फार तर एखादे कर्मकांड करुन आपल्याला आपला रिलीजन (संप्रदाय) बदलवता येतो. त्याला आपण बाप्तिस्मा, दीक्षा, सुंता, इत्यादी नावे देतो. परंतु धर्माचे तसे नाही, तो कर्माधारीत आहे जन्माधारीत नाही. तुम्ही अधर्मी की सध्दर्मी हे तुमच्या चांगल्या किंवा वाईट कर्मानुसार ठरत असते.

धर्म : भगवान बुध्द आणि सम्राट अशोकाची व्याख्या

बुध्द शासनाप्रमाणे धम्म किंवा धर्म ह्या शब्दाचा अर्थ रिलीजन किंवा संप्रदाय असा होत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भगवान बुद्धांनी आपल्या शिकवणीला कधीही बौध्द धर्म म्हटले नाही, त्यांनी केवळ धम्म (धर्म) असे म्हटले, आणि आपल्या अनुयानांना धम्मिक (धार्मिक). अर्थात जो धर्माचे (निसर्ग नियमाचे/ नीतीचे) आचरण करतो तो धार्मिक , मग तो कोणत्याही जाती, संप्रदाय किंवा वर्णाचे अथवा देशाचा का असेना. धर्म विश्वव्यापी आहे, सनातन आहे, त्याला काळाची, प्रदेशाची मर्यादा नाही, तो वैश्विक आहे. तसे नसते तर तो संप्रदाय बनला असता. धम्म किंवा धर्म म्हणजे निसर्गाचे नियम, धर्म म्हणजे विश्वाचे सत्य, जे सम्यक संबुध्दांनी (संपुर्ण जागृतांनी) आपल्या अनुभुतीने जाणले, आणि तेच जगाला सांगितले. त्यामुळे बुध्दांच्या शिकवणीला धर्म म्हटल्या गेले कारण बुध्द निसर्गाचे नियमच सांगतात.
जसे -
न हि वेरेन वेरानि समंतिध कुदाचनं
अवेरेन च समंति एस धम्मो सनंतनो

अर्थात, वैराने वैर शांत होत नाही, ते अवैरांच शांत होते हाच सनातन धर्म (निसर्गाचा नियम) आहे.

धर्माचा दुसरा पैलु म्हणजे हा वैयक्तीक असतो, संप्रदायाप्रमाणे सार्वजनीक नाही. जसे - अग्नीचा धर्म जळणे किंवा जाळणे, पाण्याचा धर्म तहान भागविने, इत्यादी.. तसेच मनुष्याचा सुध्दा एक विशिष्ट धर्म असतो. जो मनुष्याच्या कर्मावर आधारित असतो, त्यावरूनच एखादी व्यक्ती सद्धार्मिक की अधर्मी आहे हे समजते. त्याची विभागणी दोन प्रकारांमध्ये केली गेली.
  • अधर्म
  • सध्दर्म

मनुष्याच्या धर्माची व्याख्या करतांना सम्राट अशोक म्हणतात - देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा असे म्हणतो कि, माझा पुत्र, पौत्र आणि प्रपौत्रांनी धर्माची वाढ करण्यात कार्यरत राहावे, व याची अवनती करू नये, धर्म हा श्रेष्ठ आहे. पण धर्म म्हणजे काय..? पापांपासून दूर राहणे म्हणजे धर्म होय, दान, दया, सत्य व पावित्र्य यांचे पालन करणे म्हणजे धर्म होय.

अर्थात ज्याप्रमाणे भगवान बुध्द धम्मपदामध्ये म्हणतात त्याप्रमाणे, कोणतेही पाप न करणे, कुशल कर्मांचे संपादन करणे स्वचित्ताची शुद्धी करणे हेच शास्त्याचे शासन आहे, अर्थात हाच भगवानांचा धर्म (शिकवण) आहे.

सम्राट अशोकाच्या या शिलालेखावरून आपल्याला समजते की, सम्राट अशोक हे धर्मदूत होते, त्यांनी धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यात आपले संपूर्ण आयुष्य वेचले. पण धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे म्हणजे नेमके काय...? धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे म्हणजे दुसऱ्या संप्रदायातील लोकांना एखाद्या कर्मकांडाद्वारे आपल्या संप्रदायात सामील करून घेणे (Religious Conversion) नव्हे. तर प्रजाजनांमध्ये चांगल्या गोष्टींचा प्रचार करणे, बुद्धांच्या शिकवणीचा (अर्थात सद्धर्माचा) प्रचार करणे, हा खऱ्या धर्माचा प्रचार होय.

धर्माचे प्रकार :

. अधर्म : अधर्म म्हणजे वाईट धर्म किंवा वाईट गोष्टी.. जसे हत्या करणे, चोरी करणे, मद्यपान करणे, खोटे बोलणे, वासनेच्या आहारी जाणे, इत्यादी हे वाईट धर्म आहेत, अधर्म आहेत, हे मनुष्यत्वाचे धर्म नाहीत, हे धर्म माणसाला मनुष्यत्वाकडून दूर नेतात. जी व्यक्ती आपल्या शरीर, वाणी आणि मनाने अशा प्रकारचे कर्म करते, ती त्याच्या कर्मानुसार अधर्मी ठरते.
. सध्दर्म : सध्दर्म म्हणजे चांगल्या गोष्टी किंवा चांगले धर्म. बुध्दांची शिकवण हा सध्दर्म आहे असे आम्ही म्हणतो, कारण ते चांगलेच धर्म (गोष्टी) शिकवितात वाईट धर्म नाही. जसे जीवनात शुध्दता राखणे, जगाला धर्मराज्य बनविने (धर्मराज्य म्हणजे अशा समाजाची निर्मीती करणे जिथे प्रत्येक व्यक्ती एक दुसऱ्या शी न्यायाने, मैत्रीने, बंधुत्वाने वागतो, ज्या राज्यात स्वातंत्र्य, समता व बंधुता विहार करीत असते, जिथे कोणीही कोणाची वंचना करीत नाही, कोणीही कोणाला दुःख देण्याची इच्छा करीत नाहीत, सर्व जीव एक दुसऱ्यांच्या काल्याणाचीच कामना करीत असतात, त्याला धर्मराज्य असे म्हणतात. जेव्हा अशा समाजाची निर्मिती होईल तेव्हा भारत खऱ्या अर्थाने बुद्धमय होईल. कारण केवळ विशिष्ट कर्मकांड करून लोकांना केवळ नावाचे बौध्द बनवून काहीही साध्य होणार नाही.) इत्यादी सधर्म आहेत... जी व्यक्ती काया, वाचा आणि मनाने वरील धर्मांचे आचरण करते ती व्यक्ती त्याच्या कर्मानुसार सध्दर्मी बनते..
यातील महत्वाचे उदाहरण पुढीलप्रमाणे :

  • मुर्खाची संगती न करणे, शहाण्या माणसांची संगती करणे व पुजनीय लोकांची पुजा करणे हे शास्त्याचे शासन (सध्दर्म) आहे.
  • अनुकुल स्थळी निवास करणे, पुर्वपुण्य पदरी असणे आणी स्वतःला सन्मार्ग लावणे हे शास्त्याचे शासन (सध्दर्म) आहे.
  • अंगी बहश्रृतता असणे, कला संपादणे, शष्टता बाळगणे, आणी सुभाषण करणे, हे शास्त्याचे शासन (सध्दर्म) आहे.
  • आई वडिलांची सेवा करणे, पत्नी व मुलाबाळांचा सांभाळ करणे व उलाढाली न करणे, हे शास्त्याचे शासन (सध्दर्म) आहे.
  • दान देणे, धम्माचरण, आप्तेष्टांचा आदर - सत्कार करणे व पापाचरणांपासुन अलिप्त राहणे हे शास्त्याचे शासन (सध्दर्म) आहे.
  • काया, वाचा व मनाने अकुशल कर्म न करणे, मद्यपान न करणे व धार्मिक कार्यात तत्पर असणे. हे शास्त्याचे शासन (सध्दर्म) आहे.
  • गौरव करणे, अंगी नम्रता असणे, संतुष्ट राहणे, केलेले उपकार स्मरणे आणी वेळेवर धर्मश्रवण करणे, हे शास्त्याचे शासन (सध्दर्म) आहे.
  • क्षमाशील असणे, अंगी लीनता असणे,सत्पुरुषांचे दर्शन घेणे व वेळोवेळी धार्मिक चर्चा करणे, हे शास्त्याचे शासन (सध्दर्म) आहे.
  • तप करणे, ब्रह्मचर्येचे पालन करणे,आर्यसत्याचे ज्ञान संपादणे आणी निर्वाणाचा साक्षात्कार करणे हे शास्त्याचे शासन (सध्दर्म) आहे.
  • ज्याचे मन लोक धर्माने विचलीत होत नाही, जो शोकही करीत नाही, तो तर अगदी निर्मळ व पवित्र राहतो, हेच त्याच्याकरीता उत्तम मंगल होय...

हा भगवानांचा धर्म (शिकवण) अर्थात सध्दर्म होय :

  • जेणेकरुन विद्वान लोक नावे ठेवतील असे लहानात लहान सुद्धा कार्य करु नये. सर्व प्राणी सुखी होवोत. सर्वांचे कल्याण होवो, सर्वच सिद्धीस प्राप्त होवोत (अशी मैत्रीभावना करावी)
  • जम असोत वा स्थावर, दीर्घ असोत वा महान मध्यम असोत वा ह्रस्व, लहान असोत वा मोठे, दृश्य असोत वा अदृश्य, दुर असोत वा जवळ, उत्पन्न झालेले असोत वा उत्पन्न न झालेले सर्व प्राणी सुखी असोत.
  • कोणाचीही कोणी वंचना न करोत, कोणीही कोणाचा अपमान न करोत. वैमनस्य किंवा विरोध चर्याने कोणीही कोणाला दुक्ख देण्याची इच्छा न करोत.
  • ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाचे रक्षण करण्यासाठी आपले जीवन पणास लावते, त्याचप्रमाणे प्राणीमात्रांच्या प्रती मनात निस्सीम प्रेम भाव जागृत करावा.
  • मनातील बाधा वैरभाव आणि शत्रुत्व झटकुन, वर खाली व आजुबाजुला सर्वच जगताच्या प्रती मनात निस्सीम प्रेम - भाव वाढवावा.


भगवान बुद्धांनी आम्हाला वरील धर्मांचे आचरण करून धार्मिक बनायला शिकविले, त्यामुळे एखादे विशिष्ट कर्मकांड करून केवळ नावाचे बौध्द झाल्याने कोणी बुध्दांचा अनुयायी बनत नाहीत तर वरील धर्मांचे आचरण केल्यानेच कोणी धार्मिक अर्थात बुध्दांचा अनुयायी बनतो.
डॉ. बाबासाहेबांनी धर्माचे तीन प्रकार सांगीतले आहेत :

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये धम्म (धर्म) आणि रिलीजन यांच्यातील भेद स्पष्टपणे सांगितलेला आहे. जर आपण त्या ग्रंथाची मूळ इंग्रजी प्रत वाचली तर आपल्याला समजेल की, बाबासाहेबांनी त्या ग्रंथामध्ये धम्म आणि धर्म यांच्यातील भेद सांगितला नाहीतर (Religion and Dhamma) ह्या मथळ्याखाली धम्म आणि रिलीजन किंवा संप्रदाय असा फरक सांगितलेला आहे. परंतु अनुवादकांनी मराठीमध्ये अनुवाद करतांना रिलीजन ह्या इंग्रजी शब्दाचा पर्यायी मराठी अर्थ धर्म असा घेतलेला आहे. हि अनुवादकांची चूक आहे, कारण बाबासाहेबांना धम्म आणि धर्म असा भेद करायचा असता तर ते रिलीजन ह्या शब्दाचा पर्यायी भारतीय शब्द म्हणून धर्म ह्या शब्दाचा वापर करू शकले असते, पण त्यांनी तसे न करता धम्म हा एक शब्द भारतीय आणि रिलीजन हा दुसरा पाश्च्यात्य शब्दाचा वापर केला. यावरून बाबासाहेबांना धर्माची पाश्चात्य संकल्पना आणि भारतीय संकल्पना यांच्यातील भेद स्पष्ट करायचा होता. परंतु अनुवादकांनी केलेल्या चुकीमुळे अर्थाचा पूर्ण विचका झाला आणि अनेकांच्या मनात अनेक गैर समाज निर्माण झालेत.


यामुळे काही लोक व्यवहारामध्ये धर्म ऐवजी धम्म ह्या शब्दांचा वापर करण्याच्या सुचना देत असतात. पण त्यांना धम्म आणि धर्म यांच्यामध्ये असणारा स्पेलिंग मधील फरक यांच्या पेक्षा काहीच माहित असत नाहीत. त्यांना विचारले तर ते सांगतात – हिंदू, ख्रिस्ती, शीख, इत्यादी हे सर्व धर्म आहेत तर बुध्द हा धम्म आहे. मग धम्म आणि धर्म एकमेकांच्या पासून वेगळे कसे हे विचारल्यावर सांगतात, पूजा करणे, देवाला माणने हा धर्म आहे तर, देवाला नाकारणे हा धम्म आहे., इत्यादी अनेक स्पष्टीकरणे ते देत असतात. खरंतर त्यांचे हे स्पष्टीकरणे खूप हास्यास्पद आहेत. कारण बुद्धप्रणीत धर्माला बुध्द धम्म संबोधल्याने तो त्यांच्यापासून भिन्न कसा, किंवा त्यांच्या मान्यता इतर धर्म - संप्रदायाच्या विरुध्द असल्याने त्यांच्यापासून तात्त्विकदृष्ट्या भिन्न होत नाही.


वास्तविक पाहता धर्माला (बुध्द शिकवणीला) जे बुध्द धम्म असे म्हणतात खरंतर तेच ह्याच्या विरुध्द वागतात. बुध्द आणि त्यांच्या धम्म ह्या ग्रंथाच्या अनुवादकांनी जरी रिलीजन ह्या शब्दाचा पर्यायी शब्द धर्म हा घेतला असला तरी तो अर्थ रिलीजन किंवा संप्रदाय म्हणूनच घेण्यात आला आहे, हे लक्षात ठेवावे. आणि याबाबतीत जरा सखोल चिंतन करावे की, बाबासाहेबांनी रिलीजन आणि धम्म हा भेद कोणत्या आधारावर केला..? त्यामागे त्यांच्या कोणत्या संकल्पना असाव्यात..? ज्याप्रमाणे काही लोक भेद करतात बुध्द धर्म विरुध्द बुध्द धम्म, काय केवळ स्पेलिंग मधीलच फरक जाणणार कि त्यांच्यामध्ये काही तात्त्विकदृष्ट्या फरक आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न कराल. मी सुरुवातीलाच सांगितल्या प्रमाणे बाबासाहेबांना सुध्दा संप्रदाय विरुध्द निसर्गाचे नियम (बुद्धांची शिकवण) ह्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठीच रिलीजन विरुद्ध धम्म हा लेख लिहावा लागला. याबाबतीत मी पुढे संदर्भ देणारच आहे. पण धम्म आणि धर्म ह्यांच्यातील फरक केवळ स्पेलिंग नुसार जाणणाऱ्या लोकांनी जेव्हा तुम्ही बुध्द धम्म अशा प्रकारे वाक्यप्रयोग करता तेव्हा एका गोष्टीचा विचार करावा कि "बुध्द" हा धम्म कसा होऊ शकतो..? कारण बुध्द तर शास्ते आहेत, आपले अतुल्य शिक्षक आहेत. आणि धम्म म्हणजे त्या शास्त्याची शिकवण. तेव्हा आपण बुध्द धम्म हा शब्दप्रयोग बुध्दाचा संप्रदाय (Religion of Buddha) असा अर्थ काढण्यासाठी तर घेत नाही आहोत ना याचे चिंतन करावे. जेव्हा आपणच स्वतः बुद्धांच्या धर्माला (बुद्धांच्या शिकवणीला) बुध्द धम्म म्हणत संप्रदायाच्या कक्षेत बांधत असू तर मग धम्म हा संप्रदाय (तुमच्या अर्थानुसार धर्म) ह्या संकल्पने पेक्षा वेगळा कसा आहे हे सांगण्याचा आपला अधिकार काय....? कारण धम्म हा संप्रदाया पेक्षा ज्या अर्थाने वेगळा आहे तो (बुध्द धम्म हा शब्दप्रयोग ज्या अर्थासाठी केला जातो तो वापरूनच) त्याचा मुळ अर्थ नाहीसा होतो.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये धम्म किंवा धर्माचे वर्गीकरण तीन प्रकारांमध्ये केले आहे.

. धम्म भगवान बुद्धांनी धर्माचे वर्गीकरण तीन प्रकारामध्ये केलेले आहे त्यातील पहिला प्रकार म्हणजे धम्म होय. धम्म म्हणजे असे कर्म जे भगवान बुद्धांच्या शिकवणीचे अंग आहेत. भगवान बुद्धांनी जो धम्म सांगितला तो बाबासाहेब पुढील मुद्यांचे स्पष्टीकरण देऊन सांगतात : जीवनात शुचिता राखणे म्हणजे धर्म होय., जीवनात पूर्णता साधने म्हणजे धर्म होय., निर्वाण प्राप्त करणे म्हणजे धर्म होय., तृष्णा त्याग म्हणजे धर्म होय., सर्व संस्कार अनित्य आहेत असे मानणे म्हणजे धम्म होय., कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचे आधार आहे हे मानणे म्हणजे धम्म होय.


. अधम्म : अधम्म म्हणजे वाईट कर्म, असे कर्म जे भगवान बुद्धांच्या शिकवणीच्या विरुध्द आहेत. ज्या कर्मापासून भगवान बुद्धांनी दूर राहण्याचा आपल्याला उपदेश केला आहे, त्यांना अधम्म असे म्हणतात. याबातातीत बाबासाहेब खालील मुद्यांचे स्पष्टीकरण करून सांगतात. दैवी चमत्कृतींवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म होय., ग्रंथप्रामाण्य वाद हा अधम्म आहे, इत्यादी कर्म हे अधम्म आहेत. अर्थात ह्या कर्मांपासून भगवान बुध्दांनी दूर राहण्याचा उपदेश केला आहे.


. सधम्म :  सधम्म म्हणजे चांगले धर्म. मनाची मलीनता दूर करणे, जगाला धर्मराज्य बनविणे इत्यादी साधाम्माचे उदाहरण आहेत. सधम्माच्या बाबतीत बाबासाहेब म्हणतात, जेव्हा धर्म माणसाला आपल्या व्यवहारात सदाचाराची किती आवश्यकता आहे हे त्याच्या मनावर ठसवितो तेव्हा तो धर्म सध्दर्म बनतो. धर्माला सध्दर्म रूप धारण करण्यासाठी धर्माने माणसाला आचरण करण्यास कोणते वाईट धर्म (वाईट कर्म) व कोणते कुशल कर्म कोणते हे ओळखण्याचे आणि त्या आधारे आचरण करण्याचे शिकविले पाहिजे.

आपण काय शिकलो :

. धम्म आणि धर्म हे एकाच अर्थाचे दोन वेगळ्या भाषेतील पर्यायी शब्द आहेत.
. धम्म हा धर्मापासून भिन्न नसून रिलीजन (संप्रदाय) पासून भिन्न आहे.
. धम्म किंवा धर्म ह्या शब्दाचा अर्थ साधारण पणे निसर्गाचे नियम, सत्य, बुद्धांची शिकवण, इत्यादी असा आहे.
. धम्म किंवा धर्म हि कर्म आधारीत संकल्पना असून ति मनुष्याच्या कर्मावरून ओळखली जाते अर्थात चांगले कर्म करणारा मनुष्य धार्मिक तर वाईट कर्म करणारा मनुष्य अधर्मी..
. याउलट संप्रदाय हि जन्माधारीत संकल्पना आहे, जी मनुष्य कोणत्या कुटुंबात जन्माला यावरून ठरत असते. जसे हिंदू कुटुंबात जन्मलेला मनुष्य हिंदू, ख्रिस्ती कुटुंबात जन्मलेला कुटुंब ख्रिश्चन, इत्यादी...

. (लाभ आणि हानी, यश आणि अपयश, निंदा आणि स्तुती, सुख आणि दुःख हे आठ लोकस्वभाव (लोकधर्म) आहेत... वरील प्रमाणे सध्दर्माचे आचरण करणार्या सध्दर्मी व्यक्तीचा ह्या आठ प्रकारच्या लोकधर्माशी (लोकस्वभावा) शी प्रसंग आला असता त्याचे चित्त अस्थिर होत नाही, पण शोकरहीत, निर्मळ व सुखरुप राहते. - हे शास्त्याचे वचन आहे..)
सुचना : आम्हाला असे आढळून आले आहे कि या ब्लॉग वरील अनेक लेख काही लोक कॉपी करून स्वतःच्याच नावावर शेयर करीत कॉपीराईट कायद्याचे सर्रास उल्लंघन करतात, त्या सर्वांना आमचे सांगणे आहे कि ह्या ब्लॉगवरील काहीही मजकूर कॉपी करण्यापूर्वी आमची परवानगी घेणे आवश्यक आहे. सर्वांनी याची नोंद घ्यावी.....

हे सुध्दा वाचा :