गुरुवार, २० एप्रिल, २०१७

धम्माच्या बाबतीत असलेले गैरसमज... - भाग ३

आमचे फेसबुक वरील मित्र संजय क्षीरसागर यांनी भगवान बुध्दांच्या धम्माच्या संबंधाने काही प्रश्न उपस्थित केले होते, त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी सदर लेख लिहिला आहे. ह्या लेखामध्ये संजय क्षीरसागर यांचे प्रश्न व त्यांना माझ्याद्वारे दिल्या गेलेली उत्तरे यांचा समावेश केला अाहे..



संजय क्षीरसागर- यांची पोस्ट
एक विनंती :- प्रथमतः पोस्ट पूर्ण वाचा आणि मगच like ऑप्शन युझ करा. तसेच काही सूचना असल्यास, चुकीची बाब असल्यास कॉमेंट मध्ये नोंदवा. पण केवळ काड्याच घालायच्या म्हणून उगवणार असला तर .. तर मग खैर नाही.
==================================================

गौतम बुद्धाची चार आर्यसत्ये :- (१) दुःख (२) तृष्णा (३) दुःखनिरोध (४) दुःखनिरोधगामिनी प्रतिपद् अष्टांग मार्ग

अष्टांग मार्ग :- (१)सम्यक दृष्टी, चार आर्यसत्यांचे यथार्थ ज्ञान (२) सम्यक संकल्प (३) सम्यक वाचा (४) सम्यक कर्मान्त (५) सम्यक आजीविका (६) सम्यक व्यायाम (७) सम्यक स्मृती (८) सम्यक समाधी  

पंचशील तत्वे :- (१) कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे (२) चोरी न
करणे (३) व्यभिचार न करणे (४) असत्य न बोलणे (५) मादक पेय ग्रहण न करणे

डॉ. आंबेडकरांनी आपल्या ' बुद्ध आणि त्याचा धम्म ' या ग्रंथाच्या प्रास्ताविकात गौतम बुद्धाच्या चार आर्यसत्यांवर जे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, त्या अनुषंगाने हा चर्चेचा व्याप आरंभला आहे.

सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे कि, गौतम बुद्धापूर्वीपासून या देशात श्रमण परंपरा अस्तित्वात होती. या श्रमणांचे सुमारे साठहून अधिक संघ असल्याचे श्री. धर्मानंद कोसंबी यांनी आपल्या ' भगवान बुद्ध ' या ग्रंथाच्या प्रथम खंडात नमूद केले असून खुद्द गौतमच्या काळात निर्ग्रंथ ( जैन ), पुरणकाश्यप, मक्खलि गोसाल, अजित केसकम्बल, पकुध कात्यायन, संजय बेलठ्ठपुत्त हे सहा मोठे श्रमण संघ अस्तित्वात होते.

गौतमाने गृहस्थाश्रमाचा त्यागून संन्यास घेतला त्यावेळी आरंभीच्या काळात त्याने जी काही
तपश्चर्या आरंभली ती पूर्वपार परंपरेने चालत आलेल्या पद्धतींनुसार. ज्याचे वर्णन कित्येक बुद्ध चरित्रांत मिळते. परंतु इथे लक्षात घेण्याची महत्त्वाची बाब म्हणजे गौतम किंवा इतर श्रमणांना विरक्ती का यावी ? संन्यासाकडे त्यांचा ओढा का असावा ?

मानवी जीवन अस्तित्वात आल्यापासून आपल्या अस्तित्वाच्या कारणाचा शोध घेण्याची धडपड अव्याहतपणे सुरु आहे. आपण ज्या काळाचा विचार करत आहोत, त्या काळात या प्रश्नाचा शोध घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संन्यास, तपश्चर्या. यामागे आत्मज्ञान वा इच्छित देवतेची भेट, दर्शनप्राप्ती वगैरे जी काही भावना असेल ती असेल.

 याच अनुषंगाने विवेचनातून सुटत असलेला दुसरा मुद्दा म्हणजे मानवी जीवनातील दुःख. जगातील प्रत्येक धर्माचे आध्यात्मिक अस्तित्व मानवी जीवनातील दुःखावरच अवलंबून आहे.
वास्तविक धर्माचे मुख्य प्रयोजन म्हणजे मानवी जीवनाचे, समूहाचे नियमन करणे. परंतु ऐहिक जीवनातील समस्यांच्या निवारणार्थ आध्यात्म वा दैवी घटकांचा आश्रय घ्यावाच लागतो कारण निव्वळ बुद्धिवाद हा वास्तव जीवनात उपयोगी पडत नाही. असो.

गौतम व त्याचे समकालीन तसेच पूर्वसुरी याच कारणांनी, मानवी जीवन अस्तित्वाचे प्रयोजन व मानवी जीवनातील दुःख, संन्यासाकडे वळले होते. प्रचलित मार्गांनी त्यांनी या प्रश्नांवर उपाय शोधण्याचे प्रयत्न केले. पैकी येथे आपण चर्चा करणार आहोत गौतम बुद्धाच्या चार आर्यसत्य, अष्टांग मार्ग व पंशशील तत्वांची.

उपरोक्त तिन्ही घटकांचा बारकाईने विचार केला असता असे लक्षात येते कि, यातील चार आर्यसत्ये हि फक्त संन्यासी / श्रमणांना लागू होतात. गृहस्थाश्रमातील व्यक्तीस नाही. कारण हि चार आर्यसत्ये गृहस्थास लागू होतात असे मान्य केले तर मग गृह्स्थाश्रमाचा मुख्य आधारच तुटतो. किंबहुना या चार आर्यसत्यांत संन्यस्त वृत्तीचाच उघड पुरस्कार केल्याचे स्पष्ट होते. मग प्रश्न असा उपस्थित होतो कि, पंचशील तत्व व अष्टांग मार्गाची आवश्यकता का भासावी ?

गौतम हा श्रमण होता. त्यामुळे आर्यसत्यांवरच तो थांबला असता तरी ते पुरेसे होते. परंतु ज्या कारणांस्तव त्याने व त्याच्या समकालीन तसेच पूर्वसुरींनी श्रमणपरंपरेचा स्वीकार केला होता त्याचे निवारण करणे, निरसन करणेही त्यांस आवश्यक होते. यामुळेच पंचशील तत्वांची उभारणी करण्यात आली. ज्यान्वये गृह्स्थाश्रमी व्यक्तीचे जीवन व्यतीत होऊन उपरोक्त आर्यसत्यांनी ते बाधित न होता, संन्यस्त वृत्तीकडे न वळता गृहस्थाश्रमातच व्यतीत व्हावे.
इथे वादाचा मुद्दा हा होऊ शकतो कि, पंचशील तत्वे व अष्टांग मार्ग यातील प्रथम कोण ? याचे निर्णायक उत्तर माझ्याकडे तरी नाही परंतु अष्टांग मार्गांचे अध्ययन केले असता त्यातील विफलता लक्षात येऊन पंचशील तत्वेच मला आधारभूत वाटतात.

याचे मुख्य कारण म्हणजे अष्टांग मार्गांची उभारणीच मुळी चुकीच्या गृहितकावर झालेली आहे. अष्टांग तत्व सांगताना सर्व मनुष्य एकाच प्रवृत्तीने, एकाच विचाराने, बुद्धीने वागतील हे गृहीत धरण्यात आलेलं आहे जे मानवी स्वभाव वैविध्य, वैचित्र्य व वैशिष्ट्य लक्षात घेता अनैसर्गिक आहे.
त्याउलट पंचशील तत्वात काय करावे अन् काय करू नये याचे स्पष्ट निर्देश आहेत. असो.

गौतम बुद्ध व इतर श्रमणांनी जी काही तत्वे उभारली त्यांचा अंतिम हेतू मानवी जीवन सुखमय व्हावे हाच होता. त्यामुळे या तत्वांचा सर्त्व धर्मियांनी, विशेषतः जे हिंदू धर्मियांच्या निकट सानिध्यात आले त्यांनी, आपापल्या शक्तीनुसार स्वीकार केला. याबाबतीत वैदिक धर्मियांचे उदाहरण महत्वपूर्ण असून अभ्यासूंनी याकरता मनुस्मृतितील वानप्रस्थ तसेच संन्यासाश्रम प्रकरण वाचावे अशी मी सूचना करतो.

यास्थळी आणखी एक उद्भवणारा प्रश्न म्हणजे बौद्ध हा धर्म आहे का ? याचे उत्तर माझ्या मते नकारार्थीच ठरते. कारण -- (१) गौतमने याची स्वतंत्र धर्म म्हणून उभारणी केली नाही (२) गौतमने जी काही तत्वनिर्मिती केली ती श्रमणावस्थेत. त्यामुळे यास धर्म म्हणावे तर मग तो संन्याश्यांचा धर्म ठरतो, गृहस्थांचा नाही. व ज्या धर्मात गृह्स्थाश्रमास स्थान नाही तो मुळी धर्मच होऊ शकत नाही. (३) खेरीज गौतमच्या हयातीत प्रचलित पद्धतीनुसार श्रमणसंघ प्रवेश हेही एक कारण आहेच.
मग प्रश्न उपस्थित होतो, बौद्ध धर्म नाही तर काय आहे ? याचे उत्तर अनेकांनी अनेकवेळा दिलेलं आहे कि, बौद्ध हि एक जीवनपद्धती आहे. आपल्या नित्य परिचयाचे यासंबंधी दुसरे उदाहरण म्हणजे वारकरी संप्रदाय. असो.

डॉ. आंबेडकरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचा मी माझ्या परीने उत्तर शोधण्याचा यत्न केला आहे. अर्थात हा परिपूर्ण नाही याची मला जाणीव आहे परंतु यानिमित्ताने एका दुर्लक्षित विषयावर किमान चर्चा तरी घडेल अशी निष्फळ अपेक्षा आहे.



माझ्याद्वारे दिले गेलेले उत्तर :


सर तुमचा लेख चुकीच्या आधारावर लिहिला आहे, माझ्या परीने  एक - एक मुद्दा पकडून त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करित आहे...


पूर्वीच्या काळात स्वर्ग प्राप्तीसाठी यज्ञ तर मोक्ष प्राप्तीसाठी तपश्चर्या केली जायची, यातील मोक्ष हि संकल्पना श्रमण परंपरेतील होती हे आपण जाणतोच. भगवान बुध्दांच्या काळात अस्तित्वात असलेल्या ६२ श्रमण परंपरांच्या द्वारे ह्या मोक्ष प्राप्तीसाठी विविध प्रकारच्या तपश्चर्या केल्या जायच्या, त्यांच्या मार्गामध्ये समानता नव्हती. जसे - कुक्कुर व्रतिक (कुत्र्याच्या खाण्यापिण्याचे व्रत करणारे) गोव्रतिक (गायी सारखे जीवन जगणारे) , अचेलक (नग्न राहणारे), विष्ठा खाऊन जगणारे अशा अनेक प्रकारच्या तपश्चर्या होत्या. सिध्दार्थ गाैतम बोधीसत्त्व अवस्थेत असतांना त्यांनी सुध्दा तिळाच्या एका दाण्यावर जीवन जगून, श्वास कोंडून विविध प्रकारच्या तपश्चर्या करण्याचा प्रयत्न केला पण ते त्यामध्ये यशस्वी झाले नाही, शेवटी वैराग्याच्या त्या मार्गाचा त्याग करुन सम्यक समाधी लावली. आणि त्याच मार्गाने सम्यक संबोधीची प्राप्ती केल्यानंतर आपल्या धर्माचा उपदेश करतांना त्यांनी अशा तपश्चर्यांना नाकारले आहे, त्यांना मिथ्या मार्ग संबोधले आहे. चित्त शुध्द नसतांना अशा तपश्चर्यांना काहीच अर्थ नाही.


भगवान बुध्दांनी धर्माचा शॊध घेण्यासाठी बोधीसत्त्व असतांना सन्यांस स्वीकारला होता. पण निर्वाणाकडे घेऊन जाणाऱ्या ह्या धर्मयानावर आरुढ होण्यासाठी संन्यास स्वीकारण्याची गरज नाही. भगवान बुध्दांनी गृहस्थी जीवनात जगणाऱ्या लोकांसाठी हा मार्ग शॊधला आहे, ज्याचा साक्षात्कार कोणी गृहस्थाश्रमात राहून सुध्दा करु शकतो.


दुःख : तुमच्या अर्थानुसार प्रत्येक धर्म हा मानवी जीवनात असलेल्या दुःखांवरच बोलतो आणि त्यातुन सुटण्याच्या मार्गावर. पण दुःखातून सुटण्यासाठी ते कोणत्या प्रकारचा मार्ग सांगतात त्यांची काही उदाहरणे :

१. भक्ती : हा मार्ग सामान्यतः ईश्वराच्या भक्तीवर आधारीत आहे, त्यांच्या धर्मानुसार ईश्वर हा भक्तीप्रिय आहे. जर तुम्ही त्याची भक्ती कराल तरच तो तुमच्या जीवनातील दुःख नष्ट करेल, पण जर तुम्ही त्याच्या भक्तीपासुन दुर जाण्याचा प्रयत्न कराल, तर तो तुमच्या जीवनाला विविध प्रकारच्या दुःखांनी भरवून टाकेल.

२. पाैराणिक तपश्चर्या : पाैराणिक कथांमधील तपश्चर्या जरा वेगळ्या अर्थाच्या होत्या, त्यांच्यानुसार तपस्वी ईश्वराला खुश करण्यासाठी तपश्चर्या करित असत.

३. श्रमणांची तपश्चर्या याहून वेगळी होती. त्यांच्यानुसार सामान्य मानव हा अगदी सामान्य जीवन जगतो, त्याचा त्याला काही विशेष लाभ नाही. जर सत्याची प्राप्ती करायची असेल तर मला त्याच्यापेक्षा वेगळे जीवन जगावे लागेल ह्या दृष्टिकोनातून श्रमण लोक तपश्चर्येकडे वळत असावेत.

४. यज्ञ : ऎहिक जीवनात उत्तम फळाची प्राप्ती तसेच मेल्यानंतर स्वर्गात जन्म या कामनेतुन यज्ञ केले जायचे.

 त्याचप्रमाणे असे अनेक मार्ग अस्तित्वात आहेत, पण भगवान बुध्दांचा धर्म मात्र दुःखातून मुक्तीसाठी वेगळ्या प्रकारचा मार्ग सांगतो. दुःखातून मुक्ती व्हावी या इच्छेने ईश्वराची भक्ती करणे, सर्व पापकर्मांना नष्ट करण्यासाठी नदी मध्ये स्नान करणे यामध्ये काही शाैर्य लागत नाही. पण दुःखमुक्तीसाठी भगवान ज्या मार्गाचा उपदेश करतात त्यावर चालण्यास शाैर्य लागते. आपल्या मनातील राग, लोभ, द्वेष, मत्सर, ईर्षा, कामवासना यांच्या सारख्या वाईट विचारांवर विजय मिळविण्यासाठी शाैर्य लागते, भगवान बुध्द आपल्याला हाच मार्ग सांगतात.


ना मांस माशांचा आहार ग्रहण केल्याने, ना नग्न राहिल्याने, ना मुंडण केल्याने, ना जटा वाढविल्याने, ना चिंध्या परिधान केल्याने, ना शरीरावर धुळ माखल्याने, ना वेदांचे अध्ययन केल्याने, ना अग्नीहोत्रात आहुती दिल्याने अंधकारात डूबलेल्या मानवाचे मन अंधकारातुन बाहेर पडेल.. - भगवान बुध्द


चार आर्यसत्ये हे सर्वकालीन व सर्व प्रकारच्या जीवांच्या जीवनातील सत्ये आहेत, त्यांच्यामुळे गृहस्थ जीवनाचा गाभा तुटतो असे नाही. भगवान बुध्दांनी उपदेश केलेले आर्यसत्ये हे शाश्वत सत्ये तर आहेतच पण गृहस्थाश्रमात राहणाऱ्यांसाठी त्यांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे नाही (तरीसुध्दा ते त्यांच्या जीवनासाठी सत्येच आहेत) दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पंचशील आणि आर्य अष्टांगिक मार्गामध्ये केलेली तुलना चुकीची आहे, त्यांचा एकमेकांशी संबंध येत नाही.  प्रज्ञा,  शील आणि समाधी यांना धर्मामध्ये अधिक महत्व आहे. यातील प्रज्ञा आणि शील ह्या पारमिता आहेत तर समाधी आर्य अष्टांगिक मार्गातील आठवे अंग. त्यामुळे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ज्यांची तुलना होऊ शकत नाही. केवळ सदाचाराने (शीलाने) निर्वाणाची प्राप्ती होऊ शकत नाही, आर्य अष्टांगिक मार्ग हा महत्वाचा आहे, जो केवळ परिव्राजकांच्या साठी नसून सर्वच जीवांच्या साठी आहे. गृहस्थांसाठीच्या पंचशीलांची तुलना श्रामणेरांच्या १० शीलांशी व भिक्खुंच्या २२७ विनयांशी करता येईल. ते शील निर्वाणाच्या प्राप्तीसाठी नसून सदाचारी जीवन जगण्यासाठी उपयुक्त आहेत. भगवान बुध्दांनी उपदेश केलेला धर्म हा केवळ परिव्राजकांच्या साठी नसून तो गृहस्थांच्या साठी सुध्दा आहे कोणी गृहस्थी जीवनात सुध्दा आर्य अष्टांगिक मार्गावर चालून निर्वाणा पर्यंत पोहोचू शकतो. भगवान बुध्दांनी गृहस्थांना सुद्धा अनेक सुत्तांमधून  मार्गदर्शन केले आहे.

तुमच्या प्रश्नांची उत्तरे :

१. बोधीसत्वाने सम्यक संबोधीच्या प्राप्तीनंतर सारनाथ येथील मृगदाय वनामध्ये धर्मचक्राचे प्रवर्तन केले, आपल्या द्वारे जाणल्या गेलेल्या धर्माचा सर्व जगाच्या कल्याणासाठी संघाची निर्मिती केली तरी सुध्दा त्यांनी धर्माची स्थापना केली नाही असे म्हणता..

२. भगवान बुध्दांनी जे काही उपदेश केले ते सामान्य श्रमण अवस्थेत नसून सम्यक संबुध्द अवस्थेत केले, त्यामुळे ते सर्व प्रकारच्या जीवांसाठी केले - मग ते परिव्राजक असोत किंवा गृहस्थ..

अ) आर्यसत्ये तर शाश्वत सत्ये आहेत, पण त्यांचे आकलन करण्याचा गृहस्थांचा आणि परिव्राजकांचा मार्ग वेगळा आहे. त्यांचे उपदेश हे केवळ परिव्राजकांसाठी नसून गृहस्थांच्या साठी सुध्दा होतेच.

ब) भगवान बुध्दांच्या द्वारे केल्या गेलेल्या  कित्येक गृहस्थांना केलेल्या उपदेशातुन त्यांच्या धर्मात गृहस्थी जीवनाचे असलेले महत्व अधोरेखीत होते.

३. तिसरा प्रश्न बरोबर समजला नाही, कृपया स्पष्ट करा...


मला वाटते तुम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तर सुध्दा वर सापडले असेल, भगवान बुध्दांनी उपदेश केलेला धर्म केवळ विशिष्ट आचार पद्धतींचे आचरण करणाऱ्या लोकांचा पंथ किंवा संप्रदाय  नव्हे तर सम्यक संबुध्दांनी (संपुर्ण जागृत) अनुभव केलेले निसर्गाचे नियम आहेत, मानवाच्या कल्याणासाठी उपदेश केलेला तो मार्ग अाहे, ज्याचे प्रवर्तन त्यांनी सारनाथ येथे केले, ज्याला धर्मचक्रप्रवर्तन असे म्हणतात.


सर्व जीव सुखी होवोत.।
सर्वांना हिताचा मार्ग सापडो....

- पियुष खोब्रागडे..




सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...

बुधवार, ५ एप्रिल, २०१७

देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा...


देवांच्या प्रिय अशा प्रियदर्शी सम्राट अशोक यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांच्या मंगल स्मृतीस विनम्र अभिवादन. सम्राट अशोक हे महान धर्मसम्राट होते, त्यांच्या जीवन कार्याबद्दल जाणून घेण्याच्या जरासा प्रयत्न जरी केला तरी आपल्याला समजून येईल कि, त्यांच्यासारखा राजा दुसरा कोणी होऊन गेला असेल. पण जगाच्या ह्या महान धर्मसम्राटाच्या कार्याचा आणि त्याने भारतभुमीला प्राप्त करुन दिलेल्या गौरवाचा विसर आपल्याला पडलेला आहे. परंतु उशिरा का होईना पण यावर्षी काही मंडळींनी पुढाकार घेऊन ह्या धर्मराजाची जयंती यावर्षी पासून नियमितपणे साजरी करण्याचा तसेच त्यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सामान्य जनतेला माहिती व्हावी, त्यासाठी त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा एक सर्वसामान्य विचार सुध्दा अभिनंदनास आणि साधुवादास पात्र आहे..


सम्राट अशोकांच्या जयंतीनिमित्य त्यांनी मार्गदर्शक म्हणुन लिहून ठेवलेल्या अनेक अभिलेखांच्या बाबत थोडक्यात माहिती देण्यासाठी तसेच त्यांच्या नावावर काही अपप्रचार करणाऱ्यांना उत्तर म्हणुन सदर लेख लिहित आहे (काही दिवसांच्या पुर्वी एका वेबसाईटवर एक लेख वाचण्यात आला होता, ज्यामध्ये सम्राट अशोकांच्या बाबतीत असा अपप्रचार करण्यात आला होता कि, त्यांनी आपल्या लेखांमध्ये आपण बौध्द असल्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही, एवढेच काय तर त्यांनी बौध्द धर्माचा सुध्दा उल्लेख केलेला नाही. अशाप्रकारे चुकीच्या माहितीच्या आधारे लिहिला गेलेला तो लेख सर्वसामान्य लोकांची दिशाभुल करणारा आहे. याशिवाय जगामध्ये असे अनेक लेखक अस्तित्वात आहेत, ज्यांना कदाचित सत्य माहित असतांना सुध्दा त्यांच्या बाबतीत सामान्य लोकामध्ये गैरसमज पसरविण्यासाठी ते लिखाण करीत असतात, ज्यामध्ये त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांना कशाचाही आधार राहत नाही.  त्यामुळे अशा लेखांपासुन सावध रहावे. त्यांच्यावर विश्वास न ठेवता त्यात लिहिल्या गेलेल्या मजकुराची योग्य प्रकारे पडताळणी करावी.) आपण याप्रमाणे लेख वाचून यातुन मिळणारा संदेश ग्रहण करावा, जेणेकरून आपल्या जीवन - प्रवासामध्ये याचा उपयोग होऊ शकेल...

आपण सम्राट अशोकांना महान सम्राट म्हणतो, त्याचप्रमाणे जगामध्ये असे इतरही अनेक राजे होऊन गेले आहेत त्यांच्या संबंधी वर्णन करतांना त्यांचे भक्त असे म्हणतात कि, शंभर - दीडशे लढाया जिंकणारा व त्यातील एकही लढाई न घेणारा आमचा राजा पराक्रमी आणि महान आहे. पण वास्तविक पाहता, बाह्य युध्दामध्ये जिंकण्याचा त्याच्या महत्तेशी कसा काय संबंध लावता येईल. बाह्य युध्दात जिंकल्यामुळे तो महान होणार नाही, किंवा हरल्याने तो लहान होणार नाही; फार तर त्याचा संबंध त्याच्या युध्दकलेत असलेल्या नैपुण्यतेशी लावता येईल. कारण भगवान बुध्दांनी म्हटले आहे, युध्दामध्ये सहस्त्र योध्दांना जिंकण्यापेक्षा जो एक स्वतःला जिंकतो, तो खरा युध्दजेता होय...  त्यामुळे सम्राट अशोक महान यासाठी ठरतात कि, प्रकृती धर्माचरणाची वाढ व्हावी, यासाठी त्यांनी धर्मयुध्द केले. हे युध्द समाजातील वाईट चालीरीती विरूद्ध होते, अंधश्रध्दा आणि अधर्माविरुध्द होते. या कालखंडात त्यांनी कोणाशी युध्द न करता सुध्दा आपल्या साम्राज्यात धर्मराज्य प्रस्थापित केले, जे दिडशे लढाया जिंकणाऱ्यांसाठी सुध्दा त्याची कणभर बरोबरी साधणे शक्य झाले नाही. तुम्ही युध्द कशासाठी करत आहात..? आपला साम्राज्य विस्तार करण्यासाठी का. ? पण या सर्वांचा तुमच्या प्रजेच्या जीवनात काय फरक पडणार आहे, ते यातुन दुःखमुक्त होतील असे आपल्याला वाटते का..? एक राजा म्हणून तुमच्या प्रजेच्या प्रती तुमची काय कर्तव्ये आहेत किंवा प्रजेला तुमच्याकडून काय अपेक्षित आहे...? प्रजा सुखी व्हावी असे तुम्हा वाटते, पण ती सुखी कशी होणार याचा आपण कधी विचार केला आहे का...? केवळ बाह्य आणि ऎहिक गोष्टींचा पुरवठा केल्याने ते सुखी होणार नाहीत, त्यांच्या नित्य सुखासाठी धर्माचाच आधार घ्यावा लागेल. सम्राट अशोकांनी आपल्या जगामध्ये धर्मराज्याची स्थापना करण्यासाठी केलेला त्याग आणि दिलेले दान निःसंशय अतुल्य आहे, ज्याची तुलना करता येणे शक्य नाही.


१. अशोकांचे धर्मांतर

सम्राट अशोकांच्या बाबतीत घडलेला सर्व सामान्य इतिहास आपल्याला माहित आहेच, कि सर्व जग जिंकायला निघालेल्या राजाचे मन एका युध्दात झालेल्या रक्तपाताला पाहून पिळवटते. रक्तपाताचा हा मार्ग सोडून तो धर्माचा मार्ग निवडतो. याविषयावर लिहितांना सम्राट म्हणतात कि,

"देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाने आपल्या राज्यभिषेकाच्या आठ वर्षांनंतर कलिंग विजय संपादन केला. ह्या युध्दामध्ये दीड लाख लोकांना बंदी बनवून कारागृहात टाकण्यात आले, एक लाख लोक मारल्या गेले आणि अनेक लोक मृत्यू पावले. कलिंग राष्ट्रावर विजय मिळविल्या नंतर देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाचे धर्म अनुशीलन, धर्माप्रती लालसा आसि धर्मानुशासन तीव्र झाले." कलिंगवर विजय मिळविल्या नंतर देवांच्या प्रिय राजाला पश्चात्ताप झाला.  यासाठी त्यांनी धर्माचा स्वीकार केला हे स्पष्टपणे आपल्याला या लेखावरुन समजते. त्यामुळे याविषयावर टिका करणाऱ्या लोकांनी वास्तवतेचे भान ठेवून पुढील लेख लिहावेत.

२. धर्मयात्रा

भगवान बुध्दांनी महापरिनिब्बाण सुत्तामध्ये आपल्याला धर्मयात्रा करण्याचा उपदेश केला आहे, बुध्दधम्म आणि संघाच्या प्रती श्रध्दा असणाऱ्या प्रत्येक जीवाने ती धर्मयात्रा अवश्य करावी यासाठी सम्राट अशोकांनीच आपल्या पुढे एक आदर्श प्रस्थापित केला अाहे.

अ) बोधीवृक्षाची यात्रा : पूर्वीच्या काळी राजे महाराजे लोक केवळ शिकारीला जाण्यासाठीच राजवाड्यातून बाहेर पडत असत, तीच त्यांची एकमेव यात्रा राहत असे. पण सम्राट अशोकांनी या प्रथेच्या विरुध्द जात, अशाप्रकारच्या अधर्मी यात्रांचा त्याग केला जिथे जनावरांची हत्या होते. तर नव्या धर्मायात्रेची सुरुवात त्यांनी केली. अशा यात्रेची सुरुवात बोधीसत्वाला ज्या वृक्षाखाली बसून सम्यक संबोधीची प्राप्ती झाली बोधीवृक्षापासूनच केली. आपल्या धर्मलेखामध्ये ते म्हणतात,

"प्राचीन काळापासून विहार यात्रेला जाण्याची राजे लोकांची प्रथा होती. अर्थात या यात्रांमध्ये शिकारीसारखे कर्म पूर्ण होत असत. परंतु देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाने आपल्या राज्यभिषेकाच्या दहाव्या वर्षी बोधीवृक्षाची यात्रा केली तेव्हापासून ह्या धर्मयात्रेची प्रथा सुरु झाली. ह्या धर्मयात्रेत श्रमण आणि ब्राह्मणांचे दर्शन घेतले जाते आणि त्यांना सुवर्ण दान दिले जाते. वृध्दांचे दर्शन घेतले जाते अाणि त्यांना सुध्दा सुवर्ण दान दिले जाते. प्रजेच्या भेटीगाठी होऊन त्यांना जन्मवासी व ग्रामवासी होऊन त्यांना धर्माबाबत उपदेश किंवा अनुशासन देणे आणि धर्मासंबंधी विचारपूस करण्याची संधी मिळत असते. धर्माचा प्रिय प्रियदर्शी राजा विहार यात्रां ऎवजी धर्मयात्रांमध्ये पर्याप्त आनंद मिळवितो..."

यावरून आपल्याला समजते कि सम्राट प्रियदर्शी अशोक यांना शिकारीला जाण्यासारख्या विहार यात्रांमध्ये जराही रस नव्हता, तर धर्मयात्रा करण्यात त्यांना आनंद मिळायचा. पण येथे हे लक्षात घ्यावे कि, धर्मयात्रा म्हणजे तीर्थ जत्रा वगैरे किंवा नव्हती ज्यांचे विकृत स्वरूप आपल्याला बघायला मिळतात, तर ती एक धर्मयात्रा होती. जिथे लोक धर्म शिकायला, धर्माच्या बाबतीत कोणत्या शंका असतील तर त्या दुर करायला, आपले धार्मिक अनुभव एकमेकांशी वाटायला जात होते.

त्याचप्रमाणे "आपल्या राज्यभिषेकाच्या २० वर्षांनंतर देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाने ह्या भुमीला भेट देऊन त्याची पूजा केली, जिथे शाक्यमुनी बुध्दांचा जन्म झाला होता. त्यांनी त्या ठिकाणी एक शिलालेख लिहिला तसेच एक स्तंभ उभारला आणि या ठिकाणी भगवानांचा जन्म झाला असल्याने मुख्य करातुन मुक्त करीत केवळ त्याचा आठवा भाग जमा करण्याचा आदेश दिला.."

३. धर्मप्रचार 

भगवान बुध्दांनी उपदेश केलेल्या - ज्याचे अस्तित्व अत्यंत दुर्मिळ आहे अशा लोक कल्याणकारी धर्माला केवळ त्यांच्या साम्राज्या पुरताच नाही, तर अगदी विदेशातील लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी आपल्या धर्मदुतांना पाठविले, यामध्ये त्यांचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांचा सुध्दा समावेश होता. एवढेच नाही, तर त्यांनी आपल्या भावी पिढ्यांना सुध्दा धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी वाहून जाण्याची आज्ञा केली होती. आपल्या एका शिलालेखात ते म्हणतात कि, "देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा प्रकृती वाढलेले धर्माचरण अधिक वाढावेत यासाठी सर प्रयत्न करतात. त्यांचे पुत्र, पाैत्र आणि प्रपाैत्र सुध्दा ह्या सृष्टीच्या अंतापर्यत ह्या धर्माचरणाची ववाढ व्हावी म्हणुन प्रयत्न करतील आणि धर्म तथा शीलांच्या माध्यमातून धर्मानुशासनाचा प्रसार करतील. कारण धर्माचे शासन हे श्रेष्ठ आहे आणि शील रहित व्यक्ती हे धर्माचरण करु शकर नाही. धर्म अाहे म्हणून ह्या गुणांची वाढ होणे व त्यात खंड न पडू देणे हे श्रेयस्कर आहे. याच हेतूने हा धर्मलेख लिहविला गेला आहे. माझ्या पुत्र, पाैत्र आणि प्रपाैत्रांनी ह्या गुणांची वाढ होण्यासाठी कार्यरत रहावे व याची अवनती करू नये. राज्यभिषेकाच्या १३ व्या वर्षांनंतर देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाने हा धर्मलेख लिहविला आहे."

अशा ह्या महान सम्राटाने धर्मप्रसारासाठी आपल्या पुत्रांना दान दिले, सृष्टीच्या अंतापर्यंत आपल्या पुत्र आणि प्रपाैत्रांना कार्यरत राहण्याची अाज्ञा केली त्याशिवाय धर्मप्रसारासाठी त्यांनी अधिकारी नेमले होते. यापूर्वी अशा प्रकारच्या कोणत्याही धर्माची (नैतिकतेची) वृद्धी करण्यासाठी आपल्या अधिकार्यांना नेमले होते. याविषयावर ते लिहितात, "देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाने आपल्या राज्यभिषेकाच्या १३ वर्षांनंतर आपल्या अधिकार्यांची नियुक्ती केली , सर्व संप्रदायातील लोकांच्या दरम्यान धर्माला प्रोत्साहित करण्यासाठी आणि धर्माला शरण गेलेल्या लोकांच्या हितासाठी आणि सुखासाठी ते कार्य करतात." 

४. धर्म म्हणजे काय..? 

आतापर्यंत आपण बघितले आहे
की, सम्राट अशोकांनी धर्मप्रसारासाठी आपल्या मुला मुलींना संघाला दान दिले तर सृष्टीच्या अंतापर्यत आपल्या पाैत्र - प्रपाैत्रांना कार्य करित राहण्याची आज्ञा दिली. धर्मप्रसारासाठी विविध अधिकार्यांच्या नेमणुका केल्या. पण यामध्ये काय विशेष...? अशाप्रकारचा प्रशन काही लोकांना पडणे सहाजिकच आहे. काही लोक म्हणतील कि, धर्म प्रसारासाठी किंवा रक्षणासाठी आमच्या अमुक महाराजांनी विविध कार्यक्रम राबविले दुसऱ्या संप्रदायाच्या लोकांना कापून काढले, इत्यादी. मग यातुन सम्राट अशोक कसे काय वेगळे ठरतात..? याचे उत्तर आपल्याला पुढील लेखातुन सापडते, "देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा असे म्हणतो कि, धर्म हा उत्तम आहे, पण धर्म म्हणजे काय..धर्म म्हणजे पापांपासुन दुर रहावे, पुष्कळ चांगली कृत्ये करावीत. दान, दया, सुत्त व पावित्य यांचे पालन करावे. मी अनेक प्रकारे चक्षूदान केले आहे. द्विपाद, चतुष्पाद, पक्षी व जलचर प्राण्यांवर मी अनेक प्रकारे कृपा केली आहे. इतकी कि, मी त्यांना प्राणदान सुध्दा दिले आहे. अजूनही चांगली कामे मी केलेली अाहेत. हा लेख अशासाठी लिहिविला गेला आगे कि, लोकांनी ह्या उदाहरणा प्रमाणे वागावे व चिरकाल रहावे, याप्रमाणे वागेल तो पुण्यकृत्य करील"

सम्राट अशोकांनी अत्यंत महत्वाचा उपदेश या लेखाद्वारे आपल्याला केलेला आहे. आज आपण स्वतःला सम्राट अशोकांचे पाईक म्हणून स्वतःला घोषित करतो, परंतु त्या काळच्या इतिहासातच आपण स्वतःला गुंतवून ठेवतो.    ह्या काळामध्ये असलेल्या अनेक गोष्टींची सुरुवात सम्राट अशोकांच्या द्वारे सर्वप्रथम कशी काय केली गेली होती., ह्या सर्व गोष्टी आपण गर्वाने इतरांना सांगण्याचा प्रयत्न करित असतो. पण असे करतांना त्यांनी आपल्याला ज्या शिकवणीचा उपदेश आपल्या लेखाद्वारे तसेच आपल्या अायुष्यातुन दिला आहे, त्याचे अनुसरण करण्यापासुन किंवा त्या गोष्टींचा प्रसार करण्यापासून मात्र आपण जाणीवपूर्वक स्वतःला लांब ठेवण्याचा प्रयत्न करित असतो. कारण काही लोक एखाद्या गाथेतील किंवा शीलालेखातील वाक्य आपल्याला सांगतात, त्याचे मराठी भाषेतील भाषांतरही सांगतात, आणि त्याच्यातील एखादा शब्द किंवा चिन्ह सांगुन आजच्यावकाळत तिला किती महत्व प्राप्त झालेला आहे, इत्यादी गोष्टी सांगतात, पण त्या गाथेचा किंवा चिन्हाचा योग्य अर्थ समजावून सांगुन त्याचा बुध्दांनी किंवा सम्राट अशोकांनी कशाप्रकारे आपले कल्याण साधून घेण्यासाठी उपदेश केकेलावहोता, ह्या सर्व गोष्टींचा मात्र त्यांच्या दृष्टीकोनातुन काहिच महत्व राहत नाही, असे वाटते. सम्राट अशिलांचा गाैरवशाली इतिहास आपल्याला जगापुढे मांडायचा असतो, पण त्यांच्या शिकवणीचे आपल्याला अनुसरण करायचे नसते, हि फार मोठी शोकांतिका आहे. केवळ त्यांचा गाैरवशाली इतिहास सांगितल्याने नाही, तर त्यांनी आपल्याकडून ज्या काही अपेक्षा केल्या होत्या त्या पुर्णत्वास नेण्याच्या प्रयत्न केल्यावरच आपण त्यांच्यासारख्या धम्मराज्याची स्थापना करु शकू.

अगदी भगवान बुध्दांनी धम्मपदामध्ये उपदेश केलेल्या धम्माच्या साराप्रमाणे, सर्व प्रकारचे पाप न करणे, कुशल कर्मांचे संपादन करणे, स्वचित्ताची शुध्दी करणे, हेच बुध्दांचे शासन आहे. अर्थात धर्म म्हणजेच बुध्दांची शिकवण व धर्मराज्य म्हणजेच बुध्दांचे शासन. अशा ह्या बुध्दांच्या शिकवणीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी आपके अायुष्य वाहून घेतले. लोकांमध्ये बुध्दांच्या शिकवणी नुसार आचरण करण्याची अर्थात धर्माचरणाची वृद्धी व्हावी जेणे करुन सर्व जीव सुखी व्हावेत ह्या मंगळ कामनेने विविध प्रकारच्या संप्रदायातील लोकांमध्ये धर्मप्रचार करण्याचे कार्य केले.  अर्थात विविध प्रकारची कर्मकांड करुन त्यांना बळजबरीने किंवा अन्य कोणत्याही प्रकारे त्यांचे धर्मांतर करुन केवळ नावाचे बाैध्द बनविले नाही. तर त्यांच्या शिकवणीला त्यांच्यात प्रस्थापित करूनत्यांच्या आचरणातुन शिकवण प्रदर्शित करुन सम्राट अशोकांनी धर्मराज्याची प्रस्थापना केली.

 ५. धर्मराज्यात सर्व समान आहेत...

अशा ह्या धम्मराज्यामध्ये कसल्याही आणि कोणत्याही प्रकारचा भेद नव्हता. त्या धम्मराज्यामध्ये सर्व जगाच्या हितासाठी आणि सुखासाठी महाकारुणिक भगवान बुध्दांनी उपदेश केलेल्या धर्माची प्रस्थापना झाली होती., त्यांचे राज्य हे धर्मराज्य बनले होते. धर्मराज्य म्हणजे अशाप्रकारचे राज्य जिथे कोणीही कोणाची वंचना करीत नाहीत, कोणीही कोणाचा अपमान करित नाहीत, सर्व जीव एकमेकांच्या कल्याणाचीच कामना करित असतात. त्यांच्या राज्यामध्ये जातीभेदअंधश्रध्दा, निरूपयोगी कर्मकांड किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नव्हता. त्याला समजण्यासाठी खालील धर्मलेखाची मदत होईल, "देवांचा प्रिय प्रियदर्शी राजाची अशी इच्छा आहे कि, सर्व संप्रदायाच्या लोकांनी त्याच्या साम्राज्यात सर्वत्र रहावे. कारण ते त्यांच्यासाठी संयम व भावशुध्दी यांची इच्छा करतात."

यावरून आपल्याला समजते कि, इतर संप्रदायातील लोकांच्या प्रती सुध्दा त्यांना आपल्या मुला - बाळाप्रमाणेच काळजी होती. त्यांच्यामध्ये ते कोणत्याही प्रकारचा भेद करत नव्हते. तर सर्व संप्रदायातील लोकांनी एकमेकांच्या संप्रदाय आणि शिकवणीचा आदर करित त्यांच्यातून जे काही चांगले आहे, ते स्वीकारायला पाहिजे. याबाबतीत ते लिहितात, "सर्व संप्रदायातील लोकांचा एकमेकांशी चांगला संबंध असायला हवा. त्यांनी दुसऱ्यांच्या शिकवणीला ऎकले पाहिजे आणि त्यांचा सन्मान केला पाहिजे. देवांच्या प्रि प्रियदर्शी राजाची अशी इच्छा आहे कि, इतर संप्रदायातील चांगल्या शिकवणीला सर्वांनी समजून घेतले पाहिजे " यावरून आपल्याला त्यांचा इतर संप्रदायाच्या आणि संप्रदायीक लोकांच्या प्रती असलेला दृष्टिकोन समजतो. ते सांप्रदायिक भेदभाव पाळणारे कोणत्याही प्रकारचे सांप्रदायिक नव्हते. तर सर्व जीव सुखी व्हावेत, त्यांच्यातील सर्व प्रकारची (सामाजिक/सांप्रदायिक)  बंधने नष्ट व्हावीत व एक मानव जात म्हणून त्यांनी सदाचारी जीवन जगावे ह्या ध्येयाला पुढे करुन धर्मसचा प्रचार आणि प्रसार करणारे ते धार्मिक होते..

६. धर्मराज्यात अंधश्रध्दा - कर्मकांड यांचे नाही, तर धर्माचे अस्तित्व आहे..

आपल्या देशामध्ये सध्या आपल्या अनेक प्रकारच्या श्रध्दा अंधश्रध्दा बघायला मिळतात. ह्या केवळ आजच तयार झालेल्या नाहीत, तर फार पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत. जसे समुद्राचा प्रवास करु नये, शुभ मुहूर्त पाहुनच मंगल कार्ये करावीत. इत्यादी अनेक प्रकारच्या अंधश्रध्दांचे अस्तित्व फार पूर्व काळापासून सुध्दा आपल्या समाजामध्ये होतेच. त्यांच्या ह्या अस्तित्वाला कदाचित अधर्माची शिकवणच कारणीभूत असावी.  पण सम्राट प्रियदर्शी अशोकांचे साम्राज्य हे धर्मराज्य होते. ते आपल्या ससाम्राज्याचा कारभार धम्माप्रमाणे करित असल्यानेत्यांच्या राज्यात अशा अंधश्रध्दांवर प्रहार होणे निश्चितच होते. त्यासाठी ते लिहितात, 

"देवांचा प्रिय प्रियदर्शी राजाचे म्हणणे अाहे की, लोक संकटात असतांना, पुत्र किंवा मुलीच्या जन्माच्या वेळी, लग्नप्रसंगी आणि याप्रकारच्या अन्य प्रसंगी  शुभ किंवा अशुभ समयी पुष्कळ प्रकारच्या चांगल्या - वाईट कर्मांचे संपादन करतात. यावेळी स्त्रीया अनेक प्रकारचे शुद् व निरर्थक विधी करतात. मंगल कार्य अवश्य करावीत पण याप्रकारचे मंगल कार्य अल्पफळ देणारे असतात. धर्माच्या द्वारे केले जाणारे धर्मकार्य महाफलदायज असते. (धर्माचे मंगल कार्य म्हणजे दास आणि सेवक यांच्याशी योग्य व्यवहार, शास्त्यांचा आदर , प्राण्यांची अहिंसा, श्रमण किंवा ब्राह्मणांना दान, प्राण्यांच्या सोबत आत्मसंयमाचा व्यवहार, तथा याप्रकारचे अन्य मंगलकार्य केले जावे म्हणुन पिता पुत्र बंधू आणि स्वामी यांनी सांगावे कि, हे धम्ममंगल चांगले आहे, आणि ह्याला तोपर्यंत संपन्न करावे, जोपर्यंत लक्ष्याची पूर्ती होत नाही. याशिवाय दान देणे चांगले आहे, हे एक श्रेष्ठ कार्य अाहे. पण धम्मदाना सारखे दुसरे दान, उपकार किंवा अनुभव नाहीत..) याशिवाय अन्य पप्रकारच्या मंगल कार्यांनी कार्यसिद्धी होईल असे नाही. त्यांच्या आचरणाने कार्यसिद्धी होवो अथवा न होवो. ते पृथ्वीवरील लोकांसाठीच असते परंतु धर्ममंगल सदासर्वकाळ पुण्यकारकच असतो. जरी ह्या लोकी कार्यसिद्धी झाली नाही, तरी परलोकी मात्र बरीच फलप्राप्ती होते. आणि ह्या लोकांमध्ये त्यांची उद्देश पूर्ती झाली तर धर्ममंगल कार्यामुळे दुहेरी लाभ मिळू शकतो  ह्या लोकी कार्यसिध्दी होते, तसेच परलोकी सुध्दा अनंत पुण्य प्राप्त होते.  "

६. मनुष्यांच्या इतके प्राणी सुध्दा समान आहेत...

यावरून आपल्याला हि शिकवण मिळते कि, पुण्य प्राप्ती च्या इच्छेने निरनिराळ्या प्रकारचे पुण्य कर्म करून जास्त काही प्राप्त होणार नाही, जरी त्यापासून काही लाभ झाला तर तो अल्पकाळच राहिल. परंतुधर्माच्या अाचरणाद्वारे मिळणारे फळ हे महान असते.  आपण बुध्दवंदना करित असतांना एएक गाथा म्हणतो, 
राजा भवतु धम्मिको ।

अर्थात राजा धार्मिक होवो ह्या तारेच्या अर्थाप्रमाणे सम्राट अशोक हे धार्मिक होते. त्यांनी आपल्या राज्याचा कार्यभार हा धर्माप्रमाणेच चालविला. त्यामुळे ते जगातील एक यशस्वी सम्राट झाले. ते एक बोधीसत्त्व होते, त्यांच्या हृदयामध्ये मानवांसाठी नाहीतर सर्व जीवांसाठी मंगल मैत्री आणि महाकरुणा वसत होती. त्यांच्या राज्यात प्राण्यांना सुध्दा मनुष्यांच्या बरोबरीने सन्मान मिळत असे. फार पूर्वीपासून यज्ञामध्ये विविध प्रकारच्या पशूंचे बळी दिले जायचे, त्यांना सम्राट अशोकांनी थांबविले. 

"हा धर्मलेख देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाने लिहविला आहे. कोणत्याही प्राण्यांना ममारून हवन जरी नये. कारण देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाच्या दृष्टीने ह्या समाजात बरेच अनिष्ट प्रकार घडत असतात. तथापि असे काही समाज आहेत, ते देवांच्या पप्रिय राजाच्या दृष्टीने हितावह आहेत. पूर्वी प्रियदर्शी राजाच्या पाकशाळेत सुप बनविण्यासाठी हजारो प्राण्यांचे बळी दिले जायचे. परंतु आता हा धर्नकेख लिहविण्यात येत आहे, त्यावेळी सूप बनविण्यासाठी ककेवळ ३ च प्राणी मारल्या जात आहेत, एक हरिण आणि दोन मोर, त्यातही हरिण रोज मारल्या जात नाही. आता यापुढे एकाही राजाची इच्छा होत नाही., प्राणी देखील मारता येणार नाही. "

सम्राट अशोकांनी केवळ लेखच लिहिले नाहीत, तर त्याप्रमाणे उपक्रम सुध्दा राबविले आणि त्यांना यशस्वी सुद्धा करुन दाखविले.  एका लेखातुन ते म्हणतात,  "आज बरीच वर्षे झाली आहेत, शेकडो वर्षांच्या पासून प्राणी हत्या वाढर होत्या, नातेवाईकश्रमण आणि ब्राह्मणांना वाईट वागणुन दिली जात होती. परंतु आज देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाच्या धर्मानुसार लोकांच्या वर्तणुकीमुळे  युध्दात वाजविली जाणारी घंटा धर्मांततेची घोषणा म्हणून वाजविली जात आहे. लोकांना चिमान, हत्ती, दिव्य क्रांती रुपी देव इत्यादींचे देखावे बघण्यासाठी मिळावे म्हणून वाजविली जात आहे. देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाने दिलेल्या धर्मशिक्षणाने असा परिणाम झाला की, शेकडो वर्षांत दिसून आले नव्हते, इतके प्राणीहत्येचे प्रमाण कमी झाले. तसेच प्राण्यांच्या सोबत अहिंसा, नातेवाईक, ब्राम्हण व श्रमण यांचा आदर सत्कारमाता पित्यांची व वयोवृध्दांची सेवा वाढलेली दिसत आहे. आई वडील व वयोवृध्दांची सेवा लोक अधिकाधिक करत आहेत. व यासमान इतर अनेक प्रकारांनी धर्माचरण वाढलेले दिसत आहे. "

याशिवाय मनुष्यांच्या सह सर्व प्राण्यांना सुध्दा आरोग्यसेवेचा लाभ घेता यावा यासाठी अनेक दवाखाने सुरु केले. एका लेखात ते लिहितात, 

"देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाच्या राज्यात सर्वत्र तसेच त्याच्या शेजारी असलेल्या  गोल, पांडव, सतियपुत्र, केरलपुत्र तथा तांब्रपर्णी तसेच यवंतवराजा अंतियो व त्याच्या शेजारी असलेल्या इतर राज्यांच्या राज्यात प्रियदर्शी राजाने दोन प्रकारच्या चिकित्सेची व्यवस्था केली अाहे. १. मनुष्यांच्या चिकित्सेची, २. प्राण्यांच्या चिकित्सेची. मनुष्य व जजनावरांच्या उपयोगी पडतील अशा आैषधी वनस्पती होत नाही, तिथे तिथे त्या बाहेरून आणुन लावलेल्या आहेत. आणि मुळ जिथे जिथे नाहीत, ते सगळीकडून आणुन लावलेल्या अाहेत. मानवांना व पशुंना उपयोगी पडतील त्यासाठी मार्गावर ठिकठिकाणी विहिरी खोदविल्या आहेत व वृक्ष लावलेले आहेत."

 ७. धर्मराजा यश आणि कीर्तीसाठी कार्य करीत नाहीत...

ह्या लोककल्याणकारी राजाने दवाखाने सुरु करुन त्यात केवळ वविविध प्रकारच्या आैषधांचाच पुरवठा केलेला नाही, तर मनुष्य व जनावरांच्या गरजा लक्षात घेता, त्यांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी वविहिरी खोदल्या ततसेच रस्त्याच्या ददुतर्फा वृक्षांची लागवड सुध्दा केली.. असे महान कल्याणकारी सम्राट जगामध्ये क्वचितच बघायला मिळतील पण सदर लेख त्यांची महनरा प्रदर्शित करण्यासाठी केला गेलेला खटाटोप नव्हे. कारण सम्राट अशोक हे बोधीसत्त्व होते. त्यांनी जे काही कार्य केले ते सर्व जीवांच्या हितासाठी व सुखासाठी. आणि असे करित असतांना, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या यशाची, कीर्तीची किंवा लाभाची इच्छा केली नव्हती. 

याविषयावर ते लिहितात, "देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा यश किंवा किर्ती यांना सर्वश्रेष्ठ मानीत नाही. ते जे काही यश आणि किर्ती  यांची अपेक्षा करतात ते फक्त याकरिता कि, वर्तमान आणि भविष्यातील लोकांनी देखील धर्मवाक्य लक्षपूर्वक ऎकावेत आणि त्याप्रमाणे वागण्याची इच्छा उत्पन्न व्हावी म्हणुन देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा जे काही कार्य करीत आहे, ते सर्व परलोकसाठी आहे.  असे का...? अशाकरिता कि प्रत्येकाची शत्रुपासुन सुटका व्हावी आणि हा शत्रु म्हणजे आपण ज्याला पाप म्हणतो तो होय. हि गोष्ट सिध्द करणे लहान मोठ्यांना महान परिश्रम केल्याशिवायकेवळ त्याच्या मागे लागल्याशिवाय , ह्या सर्व गोष्टींचा त्याग केल्याशिवाय करणे कठीण आहे."

सम्राट प्रियदर्शी अशोकांच्या लेखांपैकी हा लेख सामान्य वाचकांसाठी समजायला कठिण आहे. सम्राट अशोक याठिकाणी म्हणतात किते यश आणि किर्ती यांना श्रेष्ठ मानत नाहीत, ते जे काही कार्य करित अाहेत ते यश आणि किर्तीसाठी नाहीत तर परलोकासाठी आहेत. त्यामुळे काही लोकांना असे वाटेल कि, मृत्यूनंतर स्वर्गामध्ये चांगले लाभ मिळावे यासाठी ते पुण्यकर्म करित आहेत. आणि भगवान बुध्दांनी तर स्वर्गापेक्षाही निर्वाणाला श्रेष्ठ मानले आहे. मग सम्राट अशोकांची महत्वाकांक्षा परलोकात क्षणिक किंवा सांसारीक आनंद प्राप्ती यासारखी लहान कशी काय असू शकेल...? पण येथे आपण हे विसरतो कि, जर सम्राट अशोकांना ऎहिक आनंदप्राप्तीची इच्छा असती तर ह्या जन्मामध्ये त्यांना ते सहज प्राप्त झाले असते. पण त्यांनी त्या सर्व ऎहिक गोष्टींचा त्याग करुन धर्माचा स्वीकार केला, जो संसाराकडुन निर्वाणाकडे घेऊन जाणारा आहे. यश आणि किर्ती हे सांसारिक आणि क्षणिक आनंद आहेत. धर्माच्या मार्गावर चालत असतांना त्यांचे काहीच मुल्य नाही  तर संसारातुन निर्वाणाकडे जाण्यासाठी ज्या शत्रुंचा नाश करावा लागतो ते पाप आहे. अशा पापाला नष्ट करण्यासाठीच सम्राट अशोक कार्य करीत असतात, जेणे करन सर्व जीव सुखी व्हावेत.




हे सुध्दा वाचा :